मुंबई : मोठा गाजावाजा करत म्हाडा भवनातील अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली गेल्या आठवड्यात कार्यान्वित केली. मात्र जेमतेम आठवड्याभरात पूर्वीप्रमाणेच पुस्तकी नोंद करत अभ्यागताना म्हाडा भवनात प्रवेश देण्याची वेळ म्हाडावर आली आहे. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वारावरील भली मोठी रांग कायम असून अभ्यागतांना उन्हात उभे रहावे लागत आहे. त्यामुळे ही प्रणाली काय कामाची असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
म्हाडा भवनात म्हाडा वसाहतीतील रहिवासी, उपकर प्राप्त इमारतीतील रहिवासी, संक्रमण शिबिरार्थी, सोडत विजेते आणि इतर नागरीक विविध कामांसाठी येतात. म्हाडा भवनातील प्रवेशासाठी अभ्यागतांना मुख्य प्रवेशद्वारावर पुस्तकी नोंद करावी लागते. ओळखपत्र दाखवावे लागते. त्यानंतर प्रत्येकाची तपासणी करून आत सोडले जाते.
एकूणच त्यासाठी बराच वेळ जातो. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वाराबाहेर अभ्यागतांची मोठी रांग लागत असे. ही बाब लक्षात घेऊन म्हाडा प्राधिकरणाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली तयार केली. या प्रणालीप्रमाणे अभ्यागतांना रांगेत उभे राहण्याची गरज नसल्याचा दावा म्हाडाने केला.
म्हाडाच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षक अभ्यागतांचे फोटो ओळखपत्र स्कॅन करुन त्यांचे छायाचित्र मोबाईलमध्ये काढतात. ही प्रक्रिया झाल्यानंतर त्यांचे फेस रिंडीग करून त्यांना तात्काळ प्रवेश दिला जातो. मागील आठवड्यात ही प्रणाली कार्यान्वित झाली. मात्र म्हाडाच्या प्रवेशद्वाराबाहेरील रांग काही कमी झालेली नाही. आजही म्हाडाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर अभ्यागतांची मोठी रांग दिसून येत आहे. अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली अनेकदा बंद पडत असल्याने पुस्तकी नोंद करून प्रवेश देण्याची वेळ सुरक्षारक्षकांवर येत आहे.
मी दुपारी १२.५३ पासून रांगेत उभा होतोत. दुपारी १.२४ मिनिटांनी मला प्रवेश मिळाला. माझ्यासह अनेक नागरीक, वयोवृद्ध लांब रांगेत उन्हाच्या झळा सोसत उभे असतात आणि म्हाडाची अत्याधुनिक प्रणाली मात्र काम करत नसल्याची माहिती रुपेश धनावडे यांनी दिली. प्रणाली बंद असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी समाजमाध्यमांवर याबाबतची पोस्ट टाकली आहे.
दरम्यान याविषयी म्हाडाच्या संबंधित अधिकार्यांना विचारले असता त्यांनी प्रणाली योग्यप्रकारे काम करत असून प्रणाली बंद असल्याचे आरोप फेटाळून लावले. धनावडेंच्या तक्रारीची दखल घेत प्रणाली तात्काळ सुरु केली. मात्र त्यानंतर पुन्हा काही वेळाने बंद पडल्याचे धनावडे यांनी सांगितले.