भाजपानं भ्रष्टाचाराचा नवा आरोप करत पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर तब्बल १००० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. वांद्रे येथील १ एकर ५ गुंठे क्षेत्रफळाची सरकारी जागा खासगी विकासकाला कवडीमोलाने विक्री केल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. या व्यवहारात खासगी विकासकाला कोटी रुपयांचा फायदा झाल्याचा दावा आशिष शेलार यांनी केला आहे. नेमकं प्रकरण काय आहे ? भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुंबईतील वांद्रे येथे नियमबाह्य पद्धतीने जमिनीचा व्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. “वांद्रे पश्चिम येथील ताज हॉटेलच्या बाजूला एक एकर पाच गुंठे क्षेत्रफळाची ही जागा आहे. ही जागा महसूल विभागाच्या अखत्यारीत येते. वांद्रे पश्चिम येथे अगदी मोक्याच्या ठिकाणी असणारी ही जागा १९०५ पासून पारसी कुव्हलन होम फॉर वूमन चॅरिटेबल ट्रस्टला भाडेतत्वावर दिली होती. या ट्रस्टचा करार १९८० सालीच संपुष्टात आला आहे. नव्या विकास आराखड्यात या जामिनीवर 'पुनर्वसन केंद्र' असं आरक्षण टाकण्यात आलं आहे. असं असतानाही या जमिनीचा व्यवहार करण्यात आल्याचं,” आशिष शेलार यांनी म्हटले आहे. ही जागा सरकारी मालमत्ता असतानाही 'रुस्तमजी' नावाच्या एका खासगी विकासकाला विकली असल्याचा दावा आशिष शेलार यांनी केला आहे. १,९०,००० फुटांची ही जागा त्या विकासकाला मालकी हक्कावर दिली असून या व्यवहारात सरकारला १००३ कोटी रुपयांचा तोटा झाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या जागेवर नियमानुसार जे बांधकाम मंजूर केलं जाईल त्यानुसार या जमिनीची किंमत एक हजार कोटींपेक्षा जास्त आहे. मात्र केवळ २३४ कोटी रुपयांना ही जमीन विकण्यात आली, असेही शेलार म्हणाले. “चॅरिटी कमिशनच्या जॉईंट चॅरिटी कामिशनरने या जागेच्या विक्री व्यवहाराला परवानगी दिली. ट्रस्टसोबत असलेला करार संपल्यानंतर ही जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असताना ह्या जमीनीची विक्री करण्यास मान्यता देण्यात कशी आली?” असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. “रुस्तमजीया विकासकाशी महाविकास आघाडी कुठल्या मंत्र्याशी लागबांधे आहेत, ज्यामुळे या व्यवहाराला परवानगी मिळाली आणि सरकारला तोट्यात टाकून हा व्यवहार झाला असाही सवाल त्यांनी विचारला आहे.