मुंबई: रत्नागिरीमधील गुहागर येथे फेब्रुवारी महिन्यात टॅग करण्यात आलेल्या बागेश्री आणि गुहा या कासवीणींशी सॅटेलाईट संपर्क तुटल्याचे लक्षात आले आहे. दोघींशीही संपर्क तुटला असून तो पुन्हा साधण्यासाठी संशोधक प्रयत्न करत आहेत.
रत्नागिरी येथून सुरू झालेला बागेश्री आणि गुहाचा प्रवास श्रीलंकेपर्यंत झाला. मात्र सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात दोन्ही कासवीणी संपर्क क्षेत्रात राहिल्या नाहीत. गुहाचा २१ सप्टेंबरपासून तर बागेश्रीचा २३ सप्टेंबरपासून सॅटेलाईट ट्रान्समीटरला प्रतिसाद मिळणे बंद झाले आहे. या दोन्ही कासवीणींनी २२५ दिवस सॅटेलाईट सिग्नल दिले आहेत. समुद्रातील खारे पाणी आणि बदलते वातावरण याचा परिणाम होऊन ही यंत्रणा बिघडल्याची शक्यता संशोधकांकडून वर्तवली गेली आहे.




हेही वाचा – मुंबई : फसवणुकीप्रकरणी कंपनीच्या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा
महाराष्ट्रातील कोकण भागातील केवळ १३ किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले समुद्री कासवाच्या प्रजातीची कासवे अंडी घालतात. दरम्यान, वीणीच्या हंगामात किनाऱ्यांवर येणाऱ्या या मादी कासवांच्या अंड्यांचे नैसर्गिक तसेच मानवी हस्तक्षेपामुळे होणाऱ्या नुकसानातून संवर्धन करण्यासाठी गेली अनेक वर्षे हे काम सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यात रत्नागिरीतील गुहागरच्या किनाऱ्यावर बागेश्री आणि गुहा या दोन ऑलिव्ह रिडले मादी कासवांना महाराष्ट्र कांदळवन कक्ष आणि वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या समन्वयातून सॅटेलाईट टॅग लावण्यात आले होते. या कासवांच्या सॅटेलाईट टॅगिंगनंतर यांच्या प्रवासाकडे लक्ष ठेवणाऱ्या संशोधक आणि संवर्धकांना सॅटेलाईटवरून कासवांची माहिती मिळत होती. प्रवास करत करत बागेश्रीने गोवा, कर्नाटक, कोची, केरळ तसेच पुढे नागरकॉईल हे भारताचे दुसरे टोक गाठले. पुढे बागेश्रीने श्रीलंकेला वळसा घालून बंगालच्या उपसागरात प्रवेश केला. बंगालच्या उपसागरात प्रवेश केल्यानंतर काही दिवसांनी सॅटेलाईटद्वारे मिळणारे संकेत बंद झाले आहेत.
वेगाने प्रवास करणाऱ्या बागेश्रीच्या हालचालींकडे पाहता तिचा मार्ग आणि ती प्रवास करत असलेला परिसर व्यवस्थीत माहिती असल्याची शक्यता संशोधकांकडून वर्तवण्यात आली होती. गुहा या सॅटेलाईट टॅग लावलेल्या कासवीणीने गोवा, कर्नाटकपासून लक्षद्वीप बेटांपर्यंतचा प्रवास केला. लक्षद्वीप जवळच दिर्घकाळ फिरत असलेल्या गुहाच्या हालचालींवरून तिला तिथे चांगले खाद्य मिळाले असल्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली होती. २३ जूलैपासून गुहा कासवीणीच्या सॅटेलाईट ट्रान्समीटरचा प्रतिसाद बंद झाला. पण, काही कालावधीने सॅटेलाईट सिग्नल पुन्हा मिळू लागले. गुहा आणि बागेश्रीचा सॅटेलाईट संपर्क आता पूर्णपणे तुटला असुन तो पुन्हा मिळवण्यासाठी संशोधक प्रयत्न करीत आहेत.