मुंबई: सिंगापूर, हाँगकाँग या सारख्या देशांमध्ये वेगाने डेल्टा आणि ओमायक्रॉनचा प्रसार होत असल्यामुळे तेथे करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. परंतु भारतामध्ये विषाणूच्या या दोन्ही प्रकारांचा समावेश असलेली तिसरी लाट नुकतीच येऊन गेल्यामुळे आणि लसीकरण मोठय़ा प्रमाणात झाले असल्याने येत्या काही महिन्यांमध्ये चौथ्या लाटेची शक्यता नाही. रुग्णसंख्या काही प्रमाणात वाढली तरी तीव्रता तुलनेने फार कमी प्रमाणात असेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तिसऱ्या लाटेमध्ये मोठय़ा प्रमाणात लोकसंख्या बाधित झाली आहे. तसेच लसीकरणही जास्त प्रमाणात झाल्यामुळे समूह प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे. त्यामुळे अगदी लगेचच पुढील तीन ते चार महिन्यात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची शक्यता नाही, असे मत साथरोग सर्वेक्षणतज्ज्ञ डॉ. प्रकाश डोके यांनी व्यक्त केले. लसीकरणावर भर देणे गरजेचे ओमायक्रॉनचा प्रसार झालेल्या ब्रिटनमधील काही देशांमध्येही पुन्हा रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. परंतु येथे लसीकरण सर्वाधिक झाले असले तरी अजूनही अनेक देशांमध्ये लसीकरणासाठी मोठा विरोध आहे. त्यामुळे ही येथे रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्याकडे लसीकरण मोठय़ा प्रमाणात झाले असले तरी दुसरी मात्रा अनेकांची पूर्ण झालेली नाही. त्यामुळे दोन्ही मात्रा पूर्ण करण्यावर अधिक भर देणे आवश्यक आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असताना लसीकरण पूर्ण करणे अधिक आव्हानात्मक आहे. लसीकरणामुळे मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे अनेक अभ्यासातून आढळले आहे. त्यामुळे नागरिकांनीही जागरुकतेने लसीकरण पूर्ण करण्यास पुढाकार घेणेही गरजेचे आहे, असे मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. प्रतिबंधात्मक नियमांचे पालन अत्यावश्यक करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तरी आणि लगेचच चौथ्या लाटेची शक्यता नसली तरी करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे मात्र आवश्यक आहे. रुग्णसंख्या वाढली तरी आर्थिक चक्रे सुरळीत राहण्यासाठी तरी याचे पालन करणे महत्त्वाचे आहे, असे करोना कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले. राज्यात ९९ नवे रुग्ण; शून्य मृत्यूची नोंद मुंबई: राज्यात सोमवारी दैनंदिन रुग्णसंख्या पुन्हा शंभराच्या खाली गेली आहे. सोमवारी राज्यात ९९ नवे रुग्ण आढळले आहेत, तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने कमी झाला असून पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसरी लाट झपाटय़ाने ओसरली आहे. दोन वर्षांनंतर दैनंदिन रुग्णसंख्या शंभराच्या खाली येण्याची ही दुसरी वेळ आहे. शनिवारी ९७ नवे रुग्ण आढळले होते. राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्याही देखील यामुळे कमी होत असून सध्या १ हजार २७३ रुग्ण उपचाराधीन आहेत. अन्य विषाणू प्रकाराचा धोका तूर्तास नाही देशभरात जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्यांमधून मागील काही महिन्यात विषाणूचा कोणताही नवा उपप्रकार आढळलेला नाही. तसेच आता सर्व बाधितांमध्ये १०० टक्के ओमायक्रॉनचे प्रमाण आहे. डेल्टादेखील आता फारसा आढळत नाही. त्यामुळे चौथी लाट येण्याची शक्यता धूसर आहे. परंतु विषाणूचा नवा प्रकार आल्यास मात्र लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही, साथ सर्वेक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी स्पष्ट केले.