मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आपली वर्णी लागावी असे महायुतीमधील ज्येष्ठ तसेच दोनपेक्षा जास्त वेळा आमदार असलेल्यांना वाटू लागले आहे. त्यातच कालिदास कोळंबकर, भरत गोगावले, प्रताप सरनाईक यांच्यासारख्या आमदारांनी तर उघडपणे मंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली आहे.
कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदे मिळणार हे अद्याप निश्चित झालेले नसले तरी तिन्ही पक्षांमधील इच्छुकांची संख्या लक्षात घेता सर्वांचे समाधान करण्याची तारेवरची कसरत नेतेमंडळींना करावी लागणार आहे. ९१व्या घटना दुरुस्तीनुसार विधानसभेच्या एकूण संख्याबळाच्या १५ टक्के मंत्रिमंडळाचा आकार असण्याची तरतूद करण्यात आली. यानुसार राज्यात मुख्यमंत्र्यांसह ४३ जणांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाल्याने तीन जागा भरल्या गेल्या आहेत. मंत्रिमंडळात आणखी ४० जणांचा समावेश करता येऊ शकेल.
हेही वाचा >>> मालेगाव बँक खात्यांद्वारे कोट्यावधींचे गैरव्यवहार प्रकरण : ईडीचे मुंबई व अहमदाबादमध्ये छापे, १३ कोटी ५० लाखांची रोख रक्कम जप्त
छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार गावीत, दादा भुसे, गुलाबराव पाटील आदी ज्येष्ठ किंवा वर्षानुवर्षे मंत्रीपदे भूषविलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळात आपला समावेश व्हावा, असे वाटते. पण पक्ष नेतृत्वाकडून अद्याप काहीच सूचित करण्यात आलेले नाही. दोन किंवा तीनपेक्षा जास्त वेळा निवडून आलेल्या तिन्ही पक्षांमधील आमदारांना आपला मंत्रिमंडळात समावेश व्हावा, असे वाटते.
शिंदे यांची कसोटी
शिवसेना शिंदे गटातही इच्छुकांची संख्या लक्षात घेता सर्वांचे समाधान करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कसोटी लागणार आहे. शिंदे यांच्याबरोबर बंडात सहभागी झालेल्या दहा जणांना गेल्या सरकारमध्ये मंत्रीपदे मिळाली. उर्वरित आमदारांनाही आता आपला मंत्रिमंडळात समावेश व्हावा, असे वाटते. गेल्या वेळी संधी मिळाली त्यांना यंदा वगळून आमच्यासारख्यांना मंत्रिमंडळात संधी द्यावी, अशी जाहीरपणे भूमिका भरत गोगावले यांनी मांडली. तर मी चार वेळा आमदार म्हणून निवडून आलो असल्याने यंदा मंत्रीपद मिळावे, अशी अपेक्षा ठाण्यातील प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.