मुंबई : पर्यटकांना समुद्राच्या साक्षीने राणीचा रत्नहार अर्थात मरीन ड्राइव्हसह गिरगाव चौपाटीचे सौंदर्य न्याहाळता यावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेने सागरी सज्जा उभारला आहे. या सागरी सज्जामुळे मुंबईच्या वैशिष्टय़ांमध्ये आणखी एका गोष्टीची भर पडली आहे.

स्वराज्यभूमी- गिरगाव चौपाटी येथे उभारण्यात आलेल्या या सागरी सज्जाचे (दर्शक गॅलरी) उद्घाटन रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा सागरी सज्जा उभारण्यात आला आहे.

गिरगाव चौपाटीच्या उत्तर टोकाला आणि नेताजी सुभाष मार्ग, कविवर्य भा. रा. तांबे चौकालगत पावसाचे पाणी समुद्रात वाहून नेणारी पालिकेची पर्जन्य जलवाहिनी आहे. याच पर्जन जलवाहिनीच्या पातमुखावर सुमारे ४८३ चौरस मीटर आकाराचा सागरी सज्जा उभारण्यात आला आहे. ३ सप्टेंबर २०२१ रोजी पालिकेने त्याच्या कामाला सुरुवात केली आणि १२ महिन्यांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना पालिकेने केवळ आठ महिन्यांत ते पूर्ण केले.

वैशिष्टय़े..

’सागरी सज्जावरून एकाच वेळी ५०० पर्यटकांना सागरी सौंदर्य न्याहाळण्याची व्यवस्था.

’रात्री चमकणारा राणीचा रत्नहार अर्थात मरीन ड्राइव्हसह गिरगाव चौपाटीचे विलोभनीय दृश्य पाहण्यचीा सोय. 

’भरती-ओहोटी, समुद्राच्या लाटांची उंची, दाब यांचा शास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करून उभारणी.

’पर्यटकांना बसण्यासाठी आकर्षक आसन व्यवस्था, फुलझाडांची आकर्षक मांडणी