राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणास्तव बैठका, कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होत नसल्याने विरोधक वारंवार टीका करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री किंवा इतर कोणाकडे पदभार द्यावा अशी मागणी विरोधक हिवाळी अधिवेशनापासून करत आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त वर्षा निवासस्थानी ध्वजरोहण आणि त्यानंतर शिवाजी पार्कात उपस्थिती लावली होती. यानंतर त्यांच्या हस्ते मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकाच्या थीम गाण्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी बोलताना त्यांनी टीका करणाऱ्या विरोधकांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधून कौतुक वाटावं असं काम आपण करत आहोत याचा अभिमान आहे. मी गृहमंत्र्यांचे आभार मानतो. महिला सर्व क्षेत्रात पुढे येत आहेत. प्रश्न इतकाच आहे की, एका बाजूने महिला प्रगतीपथावर घोडदौड करत असताना समाजातील महिला असहाय्य आहेत. एखादी घटना घडली तर काही दिवस गोंधळ होतो आणि नंतर पुन्हा परिस्थिती शांत होतं. ही परिस्थिती कोणामुळे आणि कशामुळे निर्माण होते इतकीच चर्चा होते. पण अशा घटना घडू नयेत यासाठी आणि घडत असतील तर तिथल्या तिथे त्या आरोपींचा, गुन्हेगारांचा बंदोबस्त करणारी यंत्रणा आपल्या राज्याने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सुरु केली हे अभिनामानाचं काम आहे,” असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

दरम्यान यावेळी त्यांनी आभासी पद्धतीने उपस्थिती असली तरी पाठिंबा आभासी नाही. पाठिंबा प्रत्यक्ष असणार आहे असं सांगत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना उत्तर दिलं. “आभासी पद्धतीने मुख्यमंत्री उपस्थित असल्याचा उल्लेख मी दोन, तीन वेळा ऐकला. पण आभासी पद्धतीने उपस्थिती असली तरी पाठिंबा आभासी नाही. पाठिंबा प्रत्यक्ष असणार आहे,” असं त्यांनी सांगितलं.

“मुख्यमंत्री सहायता निधीतील मदत आपण अशा कामासाठी वापरु. तसंच ज्यावेळी निधी, मनुष्यबळ, शस्त्रांची गरज भासली तरी सरकार मागे पुढे पाहणार नाही,” असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितलं. “महिलांचं आणि राज्याचं रक्षण करणं आपलं महत्वाचं काम आहे. यानिमित्ताने ज्यांनी पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचा आभारी आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्ध ठाकरेंनी यावेळी राष्ट्रपती पदक मिळवणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं.

“आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज मातृभक्त, झाशीच्या राणीचा आपण उल्लेख करतो पण जगताना महिलांना पावलोपावली संरक्षण देतो का? नसू तर मग ही  वृत्ती/ प्रवृत्ती मोडून काढणे हे आपल्या सर्वांचे महत्वाचं काम आहे. आपला महाराष्ट्र साधू संताचा महाराष्ट्र, संस्कार महत्वाचे आहेत. जिथे संस्कार उपयोगी पडत नाहीत तिथे कायद्याचं वचक दाखवणारं आपलं पथक आपण आज स्थापन केले त्याबद्दल विशेष अभिनंदन,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cm uddhav thackeray launch theme song of mumbai police nirbhaya team sgy
First published on: 26-01-2022 at 13:11 IST