मुंबई : राज्य शासनाने दहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, महसूल विभागाच्या अप्पर मुख्य सचिवपदी राजगोपाल देवरा तर नगरविकास विभागाच्या (१) प्रधान सचिवपदी असीम गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासनातील महसूल आणि नगरविकास या दोन महत्त्वाच्या पदांवर नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नगरविकास विभाग -१ चा कार्यभार मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी यांच्याकडेच होता. आता या पदावर मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांची बदली करण्यात आली आहे. महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी राजगोपाल देवरा यांची नियुक्ती झाली आहे. ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांची मदत आणि पुनर्वसन विभागात बदली करण्यात आली आहे. अनुपकुमार (कृषी व पशुसंवर्धन), राधिका रस्तोगी (पर्यटन), संजय खंदारे (पाणीपुरवठा), एकनाथ डवले (ग्रामविकास), सौरभ विजय (नियोजन) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. आर.एस. जगताप यांची यशदामध्ये उपमहासंचालक म्हणून तर जितेंद्र दौदी यांची सातारा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांचीही लवकरच बदली करण्यात येणार असल्याची मंत्रालयात चर्चा आहे.