मुंबई : ३५०व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने विशेष टपाल तिकिटाचे अनावरण मंगळवारी करण्यात आले. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते तिकिटाचे अनावरण करण्यात आले. ‘लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण भारताचे महानायक होते. महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळय़ानिमित्त सुवर्ण आणि रौप्य मुद्रा काढण्यासाठी प्रयत्न व्हावेत,’ असे प्रतिपादन राज्यपाल बैस यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई परिक्षेत्राच्या पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रकाशित करण्यात आलेल्या विशेष टपाल तिकिटाची किंमत पाच रुपये आहे.

 छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचा दूरदर्शीपणा, न्यायप्रियता, सर्वसामान्यांना न्याय देणारे आणि त्यांच्यात नवचेतना जागवणारे राजे होते.  स्वत:चे आरमार तयार करून त्यांनी स्वराज्याच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली. त्यांचाच आदर्श घेऊन महाराष्ट्रातून विविध नेत्यांनी स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केले.  त्यांच्या काळातील गड-किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी प्रयत्न व्हावेत तसेच १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य निर्मिती वेळी विशेष सुवर्ण आणि रौप्य पदक काढण्यात आले होते. आता राज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळय़ानिमित्त तसे प्रयत्न व्हावेत अशी सूचना राज्यपालांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिन वर्षांनिमित्त विशेष टपाल तिकीट अनावरण हे महाराजांच्या कर्तृत्वाला वंदन आहे.  महाराजांनी रयतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी राज्याभिषेक केला. लोकांच्या कल्याणासाठी काम करण्याचा त्यांनी घालून दिलेल्या आदर्श समोर ठेवून राज्य सरकार काम करीत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना विविध लाभ देत आहोत. रायगडाचे जतन, संवर्धन करतोय. त्यासोबत शिवसृष्टीसाठी ५० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला. राज्यातील गड-किल्ल्यांच्या जतनासाठी प्राधान्य देत आहे. त्यासाठी जे काही आवश्यक आहे, ते सर्व करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 आजच्या दिवशी विशेष टपाल तिकीट निघतेय ही आनंदाची बाब.  छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. अनेक जण मुघलांचे मांडलिकत्व पत्करून काम करीत असताना त्याकाळी छत्रपतींनी स्वकीयांसाठी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात आणल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

‘शिवरायांच्या गडकिल्ल्यांचे संवर्धन कधी करणार?’

अलिबाग : शिवाजी महाराजांचे तीनशे गडकिल्ले त्यांची जिवंत स्मारके आहेत. त्यांच्या दगडा-दगडात इतिहास आहे. या गडांचे संवर्धन राज्य सरकार कधी करणार, असा सवाल छत्रपती संभाजी राजे यांनी राज्य सरकारला केला. गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. शासनाला त्यांचे संवर्धन करणे शक्य नसेल, तर ५० किल्ले आमच्या ताब्यात द्या! आम्ही शासनाचा एकही रुपया न घेता गडकिल्ल्यांचे संवर्धन करून दाखवतो, असे आव्हान त्यांनी दिले. ३५० व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळय़ात ते बोलत होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचे त्यांनी कौतुक केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra govt issue special postage stamp on shivrajyabhishek day zws
First published on: 07-06-2023 at 02:56 IST