महाराष्ट्रातील पाणीटंचाई आणि दुष्काळाची समस्या ही मानवनिर्मित असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले. ते मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात बोलत होते. राज्यातील दुष्काळी भागात जलसंधारणाची मोहीम राबविण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या प्रयत्नांना सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. बॉलीवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी ही संस्था सुरू केली आहे. या माध्यमातून आमिर राज्यात जलसंधारणाला प्रोत्साहन देण्यासाठी काम करणार आहे. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारी योजना विशिष्ट लोकांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. व्यवसायात यश मिळाल्यानंतर समाजासाठी काम करणारी मंडळी खूपच कमी असतात. नागरिकांना सेलिब्रिटींविषयी वाटणाऱ्या आकर्षणाचा आणि विश्वासाच अशाप्रकारच्या योजना राबविण्यासाठी उपयोग होते, असेही यावेळी फडणवीसांनी म्हटले. दरम्यान, आमिर खान सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेसाठी सदिच्छादूत म्हणून काम करणार असल्याचे वृत्त यावेळी मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावले.