मुंबई : संपूर्ण देशात सुरू असलेली बेकायदा बाइक टॅक्सी सेवा, तसेच ओला, उबर व रॅपिडो कंपन्यांच्या मनमानी भाडे आकारणी धोरणाविरोधात ७ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व ओला, उबर, रॅपिडो कॅब व रिक्षाचालक देशव्यापी एकदिवसीय बंद पुकारणार आहेत. त्यामुळे ॲप आधारित टॅक्सी सेवा बंद राहणार असल्याने प्रवाशांचे हाल होण्याची चिन्हे आहेत. तसेच सार्वजनिक वाहतूक सेवा आणि पर्यायी वाहनांवर ताण येण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्षा आणि कॅब चालक विविध आंदोलनांच्या माध्यमातून आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने ओला, उबर व रॅपिडो कंपन्यांना सरकारच्या आदेशांचे पालन करण्याबाबत वारंवार आदेश दिले आहेत. मात्र या आदेशांना केराची टोपली दाखवणाऱ्या कंपन्यांविरोधात ठोस कारवाई करण्यास परिवहन विभाग धजावत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
बेकायदा बाइक टॅक्सी सेवांमुळे मुंबईमध्ये काही प्रवाशंचा मृत्यू झाला, तर अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले. या सेवा बेकायदा असल्यामुळे अपघातग्रस्त प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा विम्याचा लाभ मिळत नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे. तसेच पॅनिक बटनच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात कॅब चालकांची आर्थिक लूट सुरू आहे. केंद्र सरकारने मान्यताप्राप्त पॅनिक बटन सेवा उपकरण पुरवण्याची जबाबदारी एकूण १४० कंपन्यांवर सोपवली आहे. असे असताना राज्य शासनाने त्यापैकी सुमारे ७० टक्के कंपन्यांना अनधिकृत ठरविले आहे.
परिणामी, यापूर्वी बसवलेली उपकरणे काढून टाकण्याची नामुष्की कॅब चालकांवर ओढवली आहे. कॅब चालकांना सुमारे १२ हजार रुपयांचा भुर्दंड सोसून नवीन उपकरणे बसवावी लागत आहेत. याशिवाय शासनाने अवलंबलेल्या खुल्या रिक्षा परवाना धोरणामुळे गरजेपेक्षा जास्त रिक्षा रस्त्यावर उतरल्याने रिक्षाचालकांचे उत्पन्न विभागले गेले असून ते लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. परिणामी, रस्त्यावरील वाहतूक कोंडी व वाहतूक समस्या वाढत आहेत. या सर्व गंभीर बाबींच्या अनुषंगाने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि चालकांच्या न्याय मागण्यांसाठी देशव्यापी एक दिवसीय बंद आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय गिग कामगार मंचाचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी दिली.
गेल्या काही महिन्यांपासून ओला, उबर, रॅपिडो आणि अन्य ॲप आधारित रिक्षा, टॅक्सी, कॅबचे चालक विविध प्रकारे आंदोलन करून, प्रलंबित मागण्या पूर्ण होण्याची वाट पाहत आहेत. परंतु, अद्याप या मागण्या पूर्ण होत नसल्याने, देशव्यापी आंदोलन करून ॲप आधारित रिक्षा, टॅक्सी कॅब चालकांनी वाहन सेवा बंद ठेवण्याची हाक दिली आहे. ॲप आधारित वाहन बंद राहिल्यास, पर्यायी वाहनांचा वापर करण्याकडे प्रवासी वळतील. मात्र, पर्यायी वाहने न मिळाल्यास प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. मुंबईसह राज्यातील विविध भागातील प्रवाशांना या आंदोलनचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

