मुंबई : शेतमालाला भाव नसल्यामुळे राज्यातील शेतकरी त्रस्त आहेत. महागाई आणि बेरोजगारीने कळस गाठला असून त्याची झळ राज्यातील समस्त जनतेला बसत आहे. युवकांना रोजगारच्या संधी उपलब्ध नाहीत. स्पर्धा परीक्षेचे उमेदवार ठिकठिकाणी आंदेलन करीत आहेत. तर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे असा आरोप विरोधकांनी केला. मुख्यमंत्री कार्यालयात तीन हजारपेक्षा जास्त नस्ती (फाइल्स) पडून आहेत. कोणताही निर्णय होत नाही. परिणामी या नामधारी, घटनाबाह्य शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभाराने राज्यातील समस्त जनता त्रस्त झाली आहे, असा आरोप करीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानावर बहिष्कार घातला. विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक पार पडली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह छगन भुजबळ, अनिल परब, कपिल पाटील, विनोद निकोले या वेळी उपस्थित होते. काँग्रेस नेते रायपूरमध्ये अधिवेशनाला असल्याने बैठकीला अनुपस्थित होते. पण पवार यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. ‘राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळाली नाही. शेतकऱ्यांच्या कांद्याला दर नाही. कांदा विक्री केल्यावर शेतकऱ्यांच्या पदरात एक रुपयादेखील पडत नाही. अशा वेळी सरकारने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करून दिलासा देणे आवश्यक असताना हे सरकार संवेदनशीलपणे कारभार करीत नाही., असा आरोप अजित पवार यांनी केला. या वेळी पवार यांनी कांदा विक्रीतून शेतकऱ्याला मिळालेल्या दोन रुपये मोबदल्याचा धनादेश दाखवला. चहावर दोन कोटींचा खर्च हे सरकार जनतेच्या पैशांची वारेमाप उधळपट्टी करीत आहे, असा आरोपही पवार यांनी केला. ‘वर्षां’ या बंगल्यावरील चहापान आणि खानपानापोटी चार महिन्यांत दोन कोटी ३८ लाख रुपये इतका खर्च केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी चहापानावर एवढा खर्च कसा काय होतो? चहात काय सोन्याचे पाणी ओतले जाते का, असा सवालही पवार यांनी केला. विकासकामांऐवजी इतर गोष्टींवर उधळपट्टी केली जात आहे. गेल्या आठ महिन्यांत जाहिरातीवर ५० कोटी रुपये, मुंबई महानगरपालिकेने १७ कोटींपेक्षा जास्त खर्च जाहिरातींवर केल्याचा आरोप पवार यांनी केला.