मुंबई : हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा निर्णय विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला विरोधी शिवसेना, काँग्रेस , शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, जनता दल संयुक्त आदी पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. अधिवेशनाचा कालावधी किमान एक आठवडा इतका वाढवावा. त्यासाठी अधिवेशनाची तारीख आठवडाभर अगोदर घ्यावी. ही मागणी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केली जाणार आहे. बैठकीला अंबादास दानवे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते आदित्य ठाकरे उपस्थित होते. अधिवेशन नागपूरमध्ये होत आहे. विदर्भातील समस्यांवर विधिमंडळात चर्चा करून सरकारला दखल घ्यायला भाग पाडले जाणार आहे. या बैठकीनंतर अजित पवार यांनी सांगितले की, अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यासाठी आणि अधिवेशनात कोणते प्रश्न हाताळायचे यासाठी ही बैठक बोलावली होती.