विधान परिषदेत विरोधकांकडून मुख्यमंत्री लक्ष्य
‘भारतमाता की जय’बाबत मुख्यमंत्र्यांनी नाशिक येथे केलेल्या वक्तव्यावरून विधान परिषदेत विरोधकांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. देशात काय म्हणावे यावरून नागरिकत्व ठरणार असेल तर मग या वादाला ज्यांनी महाराष्ट्रातील उदगीर येथे जन्म दिला त्या एमआयएमचे अध्यक्ष खासदार असद्दीन ओवेसी यांच्यावर देशद्रोहाची कारवाई का केली नाही, त्यांना अटक का केली नाही, असा सवाल विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना केला. एवढेच नव्हे तर आपले अपयश लपविण्यासाठी एमआयएमच्या विचारांवर भाजपच फुंकर घालत असल्याचा आरोपही विरोधकांनी केला. या वेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या घोषणाबाजीमुळे विधान परिषदेचे कामकाज दोनदा तहकूब झाले.
विरोधकांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी नाशिक येथे भारतमाता की जय संदर्भात केलेले वक्तव्य तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही शनिशिंगणापूर मंदिरात प्रवेश करण्यापासून महिलांना झालेला मज्जाव आणि मारहाणीचे प्रकरण सभागृहात उपस्थित केले.