शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना भवनात पक्षाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक सुरु आहे. या बैठकीत आदित्य ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी याआधीही लोकांनी शिवसेनेशी गद्दारी केली असल्याचं सांगितलं. तसंच प्राईस टॅग लावल्यासारखे सगळे गेले अशी टीकादेखील केल्याचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे.

आदित्य ठाकरे जिल्हा प्रमुखांशी संवाद साधताना भावूक झाल्याचं पहायला मिळालं. “जी आपली किंमत लावून तिथे गेले आहेत त्यांना किती किंमत द्यायची हा प्रश्न आहे. याआधीही लोकांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे. पण त्यावेळी ती व्यक्ती विरोधी पक्ष सोडून स्वार्थासाठी सत्तापक्षात गेली होती,” असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

Maharashtra Political Crisis Live : “मेलो तरी शिवसेना सोडणार नाही म्हणणारे पळून गेले”; उद्धव ठाकरेंचा बंडखोरांना टोला; वाचा प्रत्येक अपडेट…

“सत्ता येत असते, जात असते पण गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी जे काम केलं आहे त्यासाटी लोक समर्थन करत आहेत. महाराष्ट्रात अखंडता, शांतता ठेवणाऱ्या व्यक्तीला कोणीतरी धोका देत आहे याचं वाईट वाटतं,” अशी भावना आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली.

“वर्षा बंगला सोडला तेव्हा तेथील कर्मचारी आणि रस्त्यावर उभ्या शिवसैनिकांच्या डोळ्यात पाणी होतं. मला त्यावेळी माझ्या आईने सांगितलं की, धोका मित्रपक्षाने दिला असता तर काही वाईट वाटलं नसतं, पण ज्यांना मोठं केलं त्याच आपल्या लोकांनी धोका दिल्याचं वाईट वाटत आहे,” अशी माहिती आदित्य ठाकरेंनी दिली.

“तुम्ही या, आमची पूर्ण तयारी; रस्त्यावर जरी लढाई झाली…”, पवारांसोबतच्या बैठकीनंतर राऊतांचं एकनाथ शिंदेंना जाहीर आव्हान

“करोना काळात लोक मुख्यमंत्र्यांना भेटू शकत नव्हते. त्याचा फायदा घेत यांनी आपला फायदा करुन घेतला. पण त्यानंतरही उद्धव ठाकरेंनी कोणाला थांबवू नका सांगितलं. काही दिवस थोडं मिळेल, पण काम झाल्यानंतर त्यांच्या हाती काही लागेल याची शाश्वती नाही.” असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “प्राइस टॅग लावल्यासारखे सगळे गेले. उद्धव ठाकरे म्हणाले जे सोबत उभे राहिले ते आपले आणि समोर उभे राहिले ते त्यांचे. २५ वर्षांपासून ज्या पक्षाला साथ दिली ते विऱोधात गेले”.