मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात कोणतीही अडचण येऊ नये, यादृष्टीने राज्य सरकारने करोना निर्बंध शिथिल के ले आहेत. बंद सभागृहात होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त २०० व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा आता हटविण्यात आली आहे. त्यामुळे षण्मुखानंद सभागृहातील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात एकू ण क्षमतेच्या ५० टक्के (एक हजारहून अधिक) पदाधिकारी उपस्थित राहू शकतील.

राज्यात २२ ऑक्टोबरपासून बहतांश निर्बंध शिथिल होणार आहेत. मात्र, कोणत्याही बंद सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमास एकूण क्षमतेच्या ५० टक्के  किं वा जास्तीत जास्त २०० व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा लागू होती. अशा स्थितीत दसरा मेळाव्यात गर्दी होऊन करोनाच्या नियमांची पायमल्ली झाल्यास विरोधकांची टीका आणि न्यायालयीन लढाईस सामोरे जावे लागण्याची शक्यता काहींनी पक्षनेतृत्वाच्या निदर्शनास आणली. त्यानंतर सरकारी पातळीवर सूत्रे हलली आणि या मेळाव्यापुढील संभाव्य मोठा अडथळा दूर करण्यात आला. यासाठी मुख्यमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पातळीवर बराच खल झाल्याचे समजते. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केंद्र सरकारच्या निर्णयाचा आधार घेत बंद सभागृहातील कार्यक्रमासाठी असलेली २०० व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा काढून टाकली आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबताच आदेश निर्गमित केला असून आता सभागृहाच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला हजारपेक्षा अधिक पदाधिकारी उपस्थित राहू शकतील. सभागृहात येणाऱ्या सर्वाचे लसीकरण झालेले असले पाहिजे आणि या नियमांचा भंग झाल्यास सबंधित आयोजकांना ५० हजार रूपयांचा दंड आकारला जाईल, असेही आदेशात म्हटले आहे. चित्रपटगृहे, नाटय़गृहे २२ ऑक्टोबरपासून खुली होणार आहेत. तत्पूर्वी, होणाऱ्या शिवसेनेच्या षण्मुखानंद हॉलमधील दसरा मेळाव्यास विरोधकांनी आक्षेप घेतला होता.