राज्यात एप्रिलमध्ये लागू करण्यात आलेले निर्बंध काही जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. निर्बंध शिथिल करताना राज्य सरकार मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवास करण्यास मूभा देण्याचा निर्णय घेईल, अशी शक्यता होती. मात्र, राज्य सरकारने लोकल प्रवासाचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे मुंबईकरांना आणखी किती महिने दगदग सोसावी लागणार असा प्रश्न उपस्थित केला जात असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्य सरकारकडून लोकल प्रवासवरील बंदी कायम ठेवण्यात आल्यानं टोला लगावला आहे. कार्यालये सुरू केली, पण लोकल बंद. आमचा सीएम जगात भारी”, असं म्हणत मनसेनं टीकास्त्र डागलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर राज्य सरकारनं कठोर निर्बंध लागू केले होते. यात लोकल प्रवासावरही पुन्हा बंधनं टाकण्यात आली. त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा बस आणि इतर वाहनांतून प्रवास करण्याची वेळ आली. या काळात मुंबईकरांची हेळसांड होत असल्याचं दिसून आलं. तसंच एप्रिलच्या मध्यावधीत लागू करण्यात आलेले निर्बंध लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यापासून उठवण्याची मागणी होत होती. अखेर आरोग्य मंत्रालय आणि टास्क फोर्सच्या शिफारशीनंतर राज्य सरकारनं निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला. मात्र सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली नाही.

सर्वसामान्यांनी खूप सहन केलं, आता मुंबई लोकल सुरू करा; राज ठाकरेंचा ठाकरे सरकारला इशारा

राज्य सरकारच्या या भूमिकेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी टीकास्त्र डागलं. “सीएम साहेब, आपण सर्व आस्थापना चालू केल्याबद्दल आपले आभार. लोकल बंद आहेत. बसला प्रचंड वेळ लागतो, गर्दी ही असते. आपल्याला विनंती आहे; या सर्व लोकांच्या पाठीवर जर आपण शिव पंख’लावून दिलेत, तर त्यांना कामावरही जाता येईल आणि त्रास पण नाही. मला खात्री आहे, आपण हे करू शकता. आमचा सीएम जगात भारी”, अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

ट्रेनचा प्रवास अनलॉक कधी होणार?; बसमधील गर्दी पाहून तुम्हालाही हाच प्रश्न पडेल

राज ठाकरेंनी केली होती मागणी

निर्बंध उठवण्याचा निर्णय होण्याच्या काही दिवस आधी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी लोकांना प्रवास करताना त्रास होत असून, दोन डोस घेतलेल्यांना तरी प्रवासास परवानगी द्या अशी मागणी केली होती. त्याचबरोबर सरकारने योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. “महाराष्ट्र सरकारनं निर्बंध शिथिल करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे मुंबईची लोकल सेवा सुरू करण्यासाठी आता तातडीनं पावले उचलावीत. सर्वसामान्य माणसानं आत्तापर्यंत खूप सहन केलं आणि त्याची सहन करण्याची क्षमता आता संपत चालली. त्यामुळे आता यापुढे सरकारकडून काही सकारात्मक उपाय केले गेले नाहीत, तर कडेलोट होईल. त्या परिस्थितीत माझा पक्ष मुंबईकरांसोबत तर उभा राहिलच, परंतु लोकल प्रवास तातडीनं सुरू करण्यासाठी आंदोलन सुरू करेल”, असं राज ठाकरे म्हणाले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra unlock mumbai local train not allowed for local public mumbai local train rules mns uddhav thackeray bmh
First published on: 03-08-2021 at 09:09 IST