मुंबई: रेरा कायद्यानुसार दर तीन महिन्यांनी नोंदणीकृत प्रकल्पाची माहिती अद्ययावत न करणाऱ्या १९ हजारांहून अधिक प्रकल्पांना महारेराने नोटिसा बजावल्या होत्या. या दणक्यानंतर संबंधित विकासक अखेर जागे झाले. त्यांनी अद्ययावत केलेल्या माहितीनुसार ७०० प्रकल्प पूर्ण झाले आहेत. तर, ७०५ प्रकल्पाच्या नूतनीकरणाचे अर्ज सादर झाले आहेत. रेरा कायद्यानुसार नवीन प्रकल्पांना महारेरा नोंदणीसह अटी आणि तरतुदीचे पालन करणेही बंधनकारक आहे. तसेच दर तीन महिन्यांनी प्रकल्पाची माहिती अद्ययावत करून ती संकेतस्थळावर टाकणेही बंधनकारक आहे. मात्र, या नियमाचे विकासकांकडून उल्लंघन करण्यात येते. त्यामुळे अशा प्रकल्पाविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेत महारेराने डिसेंबर २०२२ मध्ये १९ हजार ५३९ प्रकल्पांना माहिती अद्ययावत करा, अन्यथा कारवाई करू, असा इशारा दिला होता. त्यानंतर विकासक जागे झाले. जानेवारीत ७०० प्रकल्प पूर्ण झाल्याची माहिती अद्ययावत करण्यात आली आहे. तसेच प्रकल्प नूतनीकरणासाठीही मोठय़ा संख्येने विकासक पुढे आले आहेत. आतापर्यंत महिन्याला सरासरी १२० अर्ज नूतनीकरणासाठी येत होते. कारवाईच्या इशाऱ्यानंतर चक्क ७०५ अर्ज जानेवारी २०२३ मध्ये दाखल झाले आहेत. पुन्हा इशारा..मोठय़ा संख्येने विकासक माहिती अद्ययावत करत असून ही समाधानकारक बाब आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळेल. दरम्यान, माहिती अद्ययावत करण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ज्यांनी अद्याप माहिती अद्ययावत केलेली नाही त्यांनी लवकर अद्ययावत करावी आणि अन्यथा कारवाई करू, असा इशारा महारेराने दिला आहे.