मुंबई : एमआयएमने महाविकास आघाडीबरोबर आघाडी करण्याची योजना मांडली असली तरी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे. औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणाऱ्या एमआयएमबरोबर उघड वा छुपी आघाडी होऊच शकत नाही. ज्यांच्याबरोबर छुपी हातमिळवणी आहे त्यांना लखलाभ ठरो, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. एमआयएम हा समविचारी पक्ष आहे हे या पक्षाने आधी सिद्ध करावे. उलट हा पक्ष कोणाचा ब संघ आहे हे लोकांना चांगलेच कळले असल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. एमआयएमबरोबर युती करण्याचा महाविकास आघाडीपुढे कोणताही प्रस्ताव नाही. एमआयएमने आधी भाजपविरोधी असल्याचे सिद्ध करावे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केले. एमआयएम भाजपविरोधी असल्याचे पक्षाच्या आतापर्यंतच्या वाटचालीतून दिसून येत नाही. त्यांनी भाजपविरोधी असल्याचे सिद्ध केल्यावरच चर्चा होऊ शकते, असेही लोंढे म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांची टीका नागपूर : एमआयएम हा पक्ष महाविकास आघाडीत सहभागी होत असेल आणि हिंदूुत्ववादी शिवसेना आता ‘जनाब’ शिवसेना होणार असेल तर काही हरकत नाही. तसेही शिवसेनेने आधीच हिंदूुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणून स्वीकारले आहे. अजानची स्पर्धा तेही घेऊ लागले आहेत, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली. रोज उठून आम्हाला भाजपची ‘बी टीम’ म्हटले जाते. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालानंतर ही चर्चा जाणीवपूर्वक पेरली जात होती. आम्ही भाजपविरोधातच काम करतो आहे. पण तरीही ही चर्चा घडवली जाते. मग त्याचा एकदा सोक्षमोक्ष लावून टाकू, म्हणूनच आम्हाला महाविकास आघाडीत घ्या असे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांना आवाहन केले आहे. आपण एकत्रितपणे भाजपला विरोध करू. आता आम्हाला घ्यायचे की नाही ते आघाडीतील पक्षांनी एकत्रित येऊन ठरवावे. इम्तियाज जलील, एमआयएम प्रदेशाध्यक्ष तथा खासदार औरंगाबाद