मालेगाव बाँबस्फोट प्रकरण

२००८ सालच्या मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील दोन फरारी आरोपी प्रत्यक्षात मरण पावले असले, तरी उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना खोटेच ‘जिवंत’ दाखवले असल्याचा खळबळजनक दावा महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकातील (एटीएस) एका निलंबित अधिकाऱ्याने सोलापूरच्या न्यायालयात केला आहे.

एटीएसचे माजी वरिष्ठ निरीक्षक मेहमूद मुजावर यांनी केलेला हा आरोप ‘अतिशय गंभीर’ असून, सरकार या प्रकरणाची चौकशी करेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मालेगाव बाँबस्फोटाच्या आरोपींमध्ये समावेश असलेले संदीप डांगे व रामचंद्र कालसांगरा हे दोघे जिवंत नाहीत, असे सोलापूरच्या दंडाधिकारी न्यायालयात गेल्या ऑगस्ट महिन्यात सादर केलेल्या अर्जात म्हटले आहे. या अर्जाचा तपशील गुरुवारी सार्वजनिक झाला.

उल्लेखनीय म्हणजे, मुजावर यांच्याविरुद्ध सोलापूरच्या एका न्यायालयात शस्त्रास्त्र कायदा आणि गुन्हेगारी स्वरूपाचा धाकदपटशा यांचा खटला दाखल झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. आपण डांगे व कालसांगरा यांच्या ‘मृत्यूविषयीचे’ सत्य उघड करू इच्छित असल्याने दबावाचा भाग म्हणून आपल्याविरुद्ध हा खटला दाखल करण्यात आल्याचा मुजावर यांचा आरोप आहे.