मुंबई: पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह घरातील पलंगात दडविल्याचा प्रकार गुरूवारी गोरेगाव येथे उघकीस आला. रागिणी सावर्डेकर असे मयत महिलेचे नाव आहे. तिचा पती प्रताप वस्कोटी याने रागिणीची हत्या केल्याचा संशय आहे. तीन दिवसानंतर घरातून दुर्गंधी येऊ लागल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. वस्कोटी फरार असून गोरेगाव पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

रागिणी सावर्डेकर (६३) या प्रताप वस्कोटी (६५) बरोबर गोरेगावमधील मोतीलाल नगरमधील चाळ क्रमांक २७९ मध्ये रहात होत्या. सोमवारी वस्कोटी याने घराची किल्ली शेजाऱ्यांकडे दिली आणि बाहेर जात असून संध्याकाळपर्यंत परत येऊ असे त्याने शेजाऱ्यांना सांगितले. मात्र तीन दिवस उलटले तरी ते घरी परतले नव्हते. त्याचा मोबाइलही बंद होता. त्यामुळे शेजाऱ्यांनी बुधवारी सावर्डेकर याचा भाचा नितीन आंबेकर यांना कळवले. ते संध्याकाळी येणार होते. दरम्यान, सावर्डेकर याच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंंतर चाळीतील रहिवाशांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घरात प्रवेश केला असता लोंखडी पलगांच्या आत रागिणी सावर्डेकर यांचा मृतदेह दडविण्यात आल्याचे आढळून आले. या प्रकऱणी गोरेगाव पोलिसांनी वस्कोटी याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) अन्वये हत्येचा गुन्हा दाखल केला.

रागीणी सावर्डेकर यांना पहिल्या पतीपासून दोन मुले आहेत. १४ वर्षांपूर्वी त्यांनी प्रताप वस्कोटी यांच्याशी दुसरा विवाह केला होता. त्यांचे पहिले पती आणि मुले उत्तर प्रदेश येथे राहतात. वस्कोटी बेरोजगार होता. रागिणी सावर्डेकर यांनी चाळीतील काही खोल्या भाडे तत्वावर दिल्या होत्या. त्या भाड्यापोटी त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांचा उदरनिर्वाह चालत होता.

या हत्येनंतर आरोपी वस्कोटी फरार झाला. त्याचा मोबाइल बंद आहे. या मोबाइलचा शेवटचा ठावठिकाणा (लोकेशन) जवळच आढळला. तेथील एका नाल्यात मोबाइल फेकून आरोपी पळून गेला. आम्ही त्याचा शोध घेत आहोत आणि लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

आर्थिक वादातून हत्येचा संशय

रागिणी सावर्डेकर आणि प्रताप वस्कोटी यांच्यात फार भांडणे होत नव्हती असे शेजाऱ्यांनी सांगतिले. एरवी त्यांचे वागणे सामान्य होते. त्यामुळे रागिणी यांची हत्या का केली याबाबत गूढ निर्माण झाले आहे. आर्थिक वादातून ही हत्या झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी रागिणी सावर्डेकर यांच्या कपटातून ४ लाख रुपये गहाळ झाले होते. वस्कोटी याने हे पैसे घेतल्याचा रागिणी यांना संशय होता. त्यातून त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. या वादातून ही हत्या झाली असावी असा पोलिसांना संशय आहे.