शासनाने १० महिन्याच्या कालखंडात मुंबईतील मोठ्या मोर्चानंतर देखील प्रतिसाद दिला नाही. इतर समाजाने मोर्चे काढले असते,तर सरकारने गुडघे टेकून त्यांना वंदन करून मागण्या मान्य केल्या असत्या, परंतु १० महिन्याच्या कालखंडात मराठा समाजाच्या तोंडाला पान पुसण्याचे काम या सरकारने केले आहे अशी टीका मराठा क्रांतीचे समन्वयक शरद काटकर यांनी केली आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आबा पाटील,माणिकराव शिंदे,संतोष सूर्याराव,विवेकानंद बाबर,महेश डोंगरे,आदी मान्यवर उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, शासनाने सुरुवातीच्या काळात फसव्या घोषणा केल्या. प्रत्यक्षात मात्र काहीच नाही, मराठा समाजाच्या मुलांना टक्केवारी चांगली मिळाली परंतु आर्थिक विवंचनेमुळे त्यांना पुढे शिक्षण घेता येत नाही ही मराठा समाजाचे शोकांतिका आहे. शेजारी बसणाऱ्या मुलांना अडीच तीन हजारात वैद्यकीय,अभियांत्रिकेचे शिक्षण घेता येते,परंतु मराठा समाजाच्या मुलांना चांगली टक्केवारी पाच-पाच लाख रुपये प्रवेश फी भरून प्रवेश मिळत नाही.

ऐंशी टक्के समाज शेतकरी आहे, ४० एकर जमिनीचे चार गुंठ्यावर आलो, कारण मराठा या नावामुळे कुठल्याच सवलती मिळत नाही ही वस्तुस्थिती असल्याचं सांगितलं. शासन फसवत आहे हे मराठा समाजाला जाणीव होऊ लागली आहे याचे रूपांतर २०१९ मध्ये पाहायला मिळेल, मुख्यमंत्र्यांनी खूप आश्वासन दिले आहेत. आरक्षण देतो म्हणाले परंतु त्यांनी कायद्यात अडकवलं,त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळत नसल्याची खंत आहे.

२९ जूनला तुळजापूर येथे जागरण गोंधळ स्वरूपी पहिले आंदोलन करणार.
२९ जून रोजी तुळजापूर येथे जागरण गोंधळ घालून पहिले आंदोलन करणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजय सावंत यांनी दिली. झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला जाग करण्यासाठी हे आंदोलन असेल, इथून पुढे मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारला न सांगता गनिमीकावा स्वरूपात आंदोलन होणार, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मराठा समाजाचे असंख्य तरुण जाऊन कोणत्या क्षणी आंदोलन करतील याची तारीख जाहीर केली जाणार नाही असं देखील सावंत म्हणाले.

…इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लावून आम्हाला आरक्षण नको.
इतर समाजाचे बांधव हे आमचे छोटे भाऊ आहेत. त्यांना दिलेल्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, ते समाजामध्ये गैरसमज निर्माण पसरवत आहेत. आमचं आरक्षण थांबल तरी चालेल पण दिलेल्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये ही आमची प्रमुख भूमिका असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबा पाटील यांनी दिली.