मुंबई शहर आणि महाराष्ट्र राज्य हे अलीकडे सर्व चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आहे. घोटाळे, महत्त्वाच्या व्यक्तींना अटक, सेलिब्रिटी आरोपी आणि धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर आणि हनुमान चालिसाचा वाद यामुळे सध्या मुंबई आणि महाराष्ट्र देशात चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, या सर्व वादांच्या पार्श्‍वभूमीवर एक चांगली बातमी समोर आली आहे. अनेक दशके फुटीरतावाद्यांची वक्तव्ये, राजकीय संघर्ष आणि हिंसाचार घडूनही ६० टक्क्यांहून अधिक अमराठी लोक म्हणतात की त्यांना स्थानिक ‘मराठी माणसे’ खूप चांगली वागवून देतात. एवढेच नाही तर ६० टक्क्यांपेक्षा जास्त मराठी लोकांना बाहेरचे लोक आपल्यासाठी धोका आहेत असे वाटत नाही. सी-व्होटर्सच्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात १ मे रोजी राज्याचा स्थापना दिवस साजरा होत आहे. त्याचवेळी ही माहिती समोर आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, यासाठी मुंबईतील सुमारे १,३०० रहिवाशांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रात जन्मलेल्या आणि इतर राज्यात जन्मलेल्यांना समान प्रश्न विचारण्यात आले आहेत. यामध्ये लोकांचे सर्वात आवडते नेते डॉ.बाबासाहेब आंबेडकर, तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेने प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वात आवडते नेते

मुंबईतील ३५.२ टक्के अमराठी लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्या पसंतीसाठी निवडले आहे तर ३२.३ टक्के मराठी लोकांनी त्यांना पसंती दिली आहे. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशात झाला आहे. या सर्वेक्षणानुसार दुसरे सर्वात प्रशंसनीय नेते बाळासाहेब ठाकरे आहेत, ज्यांना १५.३ टक्के अमराठी आणि १७.१ टक्के मराठी लोकांनी निवडले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईकरांना प्रेरणा देतात असे वाटत नाही. आश्चर्याची बाब म्हणजे, नुकत्याच दिवंगत झालेल्या लता मंगेशकर यांना ३.५ टक्के मतेही मिळाली नाहीत. जवळपास ११ टक्के अमराठी लोकांनी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना पसंती दिली आहे तर फक्त ४ टक्के मराठी भाषिकांनी त्यांना पसंती दिली आहे, असे  सर्वेक्षणात दिसून आले आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत नाराजी

मराठी आणि अमराठी दोघांनीही ‘पावभाजी’ हा त्यांचा आवडता पदार्थ म्हणून निवडला आहे. दोघांनीही मुंबईच्या सुरक्षेबाबत समाधान व्यक्त केले आहे. तर मुंबईत सार्वजनिक वाहतूक ही गंभीर समस्या असल्याचे दोघांनी मान्य केले आहे.

बॉलीवूडमधील सर्वाधिक पसंतीच्या लोकांचा विचार केला तर २५ टक्के लोक अमिताभ बच्चन आणि २४ टक्के लोक अक्षय कुमारला पसंती देतात. आमिर, शाहरुख आणि सलमान खान या दिग्गजांपैकी कोणीही १० टक्क्यांच्या वर पोहोचलेले नाही.