राज्य सरकारने भटक्या विमुक्तांच्या उन्नतीसाठी केलेल्या योजनांना निधी न पुरविणे, बंजारा समाजाच्या तांडय़ाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा नसणे, आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय या आणि अन्य समस्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ५ जानेवारी रोजी आझाद मैदान येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. भटके विमुक्त, बारा बलुतेदार, कोळी, माळी, तेली, धनगर, वडार, बंजारा, बेलदार, गवळी, न्हावी, खाती वाडी, भोई, सुतार, लोहार, धोबी या समाजाचे लोक मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे माजी खासदार व भटक्या विमुक्त चळवळीचे नेते हरिभाऊ राठोड यांनी सांगितले.