मुंबई: कांदिवली (पश्चिम) येथील बोनांझा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये शनिवारी सकाळी ७ वाजता भीषण आग लागली. आता आग आटोक्यात आली असून या दुर्घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.कांदिवलीच्या औद्योगिक वासाहेतीतील दोन मजली इमारतीत सकाळी ७ वाजता आग लागली होती. मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाने सकाळी ७.३० च्या सुमारास आग श्रेणी २ ची असल्याचे घोषित केले. दोन मजली औद्योगिक इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गाळ्यात आग लागली होती. आगीमुळे घटनास्थळी धुराचे साम्राज्य पसरले होते. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तीन छोट्या होज लाईन्स आणि एक उच्चदाबाची लाईनचा वापर करण्यात आला. दुपारपर्यंत आग सर्व बाजूंनी आटोक्यात आणण्यात आली आहे, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.
घटनास्थळी पालिकेचे कर्मचारी, पोलीस, अदानी इलेक्ट्रिसिटी, १०८ रुग्णवाहिका व सार्वजनिक बांधकाम विभागाची पथके दाखल झाली. आग विझवण्यासाठी ६ फायर इंजिन, २ फायर टेंडर, ६ मोठे टँकर असा ताफा तैनात होता. या आगीत कोणीही जखमी झाल्याची नोंद नाही.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून आग लागण्याच्या घटना वाढत आहेत. गेल्या १५ दिवसांमध्ये तीन मोठ्या आगीच्या घटना घडल्या. दक्षिण मुंबईतील ईडीच्या कार्यालयाला आग लागली होती. त्यानंतर भायखळ्यातील एका बेकरीला आग लागली होती. गेल्या आठवड्यात वांद्रे येथील मॉल आगीत भस्मसात झाला. तर सोमवारी पेडररोड येथे एका दुकानाला आग लागली होती. बहुतांशी दुर्घटनांमध्ये विद्युत यंत्रणेतील बिघाड (शॉर्ट सर्किट) हेच मुख्य कारण असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई अग्निशमन दलाने मुंबईकरांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणती खबरदारी घ्यावी याबाबतही मार्गदर्शन केले आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचना
सध्या उष्णतेच्या लाटेमुळे एकूणच तापमानात लक्षणीय वाढ होत असून विजेच्या उपकरणांवर ताण येऊन आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारितील अग्निशमन सेवा, नागरिक सुरक्षा आणि गृहरक्षक महासंचालनालयाने १ मे २०२५ रोजी याबाबत परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार मुंबई अग्निशमन दलातर्फे नागरिकांना उष्णतेच्या लाटेमध्ये घ्यावयाच्या खबरदारीबद्दल आवाहन करण्यात आले आहे. मुंबईतील कोट्यवधी नागरिकांनी जर खबरदारी घेतली, तर आग लागण्यासारख्या घटनांमध्ये लक्षणीय घट होऊ शकते, असे प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर यांनी म्हटले आहे.
मुंबई अग्निशमन दलाने केलेल्या सूचना
– घरगुती व व्यावसायिक ठिकाणांवरील विद्युत वाहिन्या, प्लग, स्विच बोर्ड्स आणि उपकरणांची नियमित तपासणी करावी.
– वापरानंतर पंखे, एसी, टीव्ही, मिक्सर, गीझर, इस्त्री इत्यादी उपकरणे त्वरित बंद करावीत.
– जुन्या किंवा जीर्ण वायरिंगची तज्ज्ञांच्या मदतीने दुरुस्ती करावी.
– आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी लागणारे सर्व मार्ग (जीने, प्रवेशद्वार) कायम मोकळे ठेवावेत.
– एकाच प्लग सॉकेटमध्ये अनेक विद्युत उपकरणे लावणे टाळावे. ओव्हरलोडिंग टाळून योग्य प्रकारे विद्युत उपकरणे वापरावीत.
– वातानुकूलित (AC) यंत्रणेची नियमित देखभाल करणे आवश्यक आहे.
– घरात, दुकानात किंवा कार्यालयात किमान एक ‘फायर एक्सटिंग्विशर’ ठेवावा आणि त्याचा योग्य वापर शिकून घ्यावा.
– रात्री झोपताना मोबाइल चार्जिंग किंवा अन्य उपकरणे चालू ठेवणे टाळावे.
– रुग्णालये, नर्सिंग होम, क्लिनिक्स यांनी आवश्यक ती अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित ठेवून वेळेवर अग्निसुरक्षेचा आढावा घ्यावा
– आग लागल्यास वेळ न दवडता आपत्कालीन क्रमांक १०१ वर संपर्क साधावा.