शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वांद्रे येथील निवासस्थान ‘मातोश्री’ आणि शिवसेनेच्या शाखा अनधिकृत असल्याचा काँग्रेस नगरसेविकेने गुरुवारी पालिका सभागृहात आरोप करताच शिवसेनेचा भडका उडाला. परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आणि सभागृहातील वातावरण तंग बनले. मात्र याच गोंधळाच्या वातावरणात महापौरांनी पुढचे कामकाज रेटत पुढील विषयाची घोषणा केली आणि हळूहळू वातावरण शांत झाले.गोरेगाव येथील भगतसिंग नगरमध्ये ओशिवरा नदी बुजवून मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. ही जागा पालिकेच्या अखत्यारीत येत नाही. मात्र म्हाडा, जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही ठोस कारवाई झालेली नाही, असे सांगत नगरसेविका प्रमिला शिंदे यांनी गुरुवारी पालिकेच्या सभागृहात अनधिकृत बांधकामांचा मुद्दा उपस्थित केला. या अवैध बांधकामांमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास कोण जबाबदार राहील, या शिंदे यांच्या प्रश्नाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला. मुंबईतील चारही नद्या, नाल्यांना अनधिकृत बांधकामांनी वेढले आहे. मात्र पालिका व म्हाडा, जिल्हाधिकारी यांच्या हद्दीच्या वादामुळे ही बांधकामे वाढली आहेत. याठिकाणी अनेक बेकायदेशीर व समाजविघातक कामे सुरू असतात. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे मत सर्वपक्षीय नगरसेवकांनी व्यक्त केले. त्याच वेळी काँग्रेसच्या नगरसेविका वकारुन्निसा अन्सारी यांनी तारस्वरामध्ये ‘मातोश्री’ आणि शिवसेनेच्या शाखाही अनधिकृत असल्याचा आरोप केला आणि सभागृहातील वातावरणच बदलून गेले. शिवसेनेचे नगरसेवक प्रचंड खवळले आणि त्यांनीही काँग्रेसवर आरोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली. उभयपक्षांचे नगरसेवक हमरातुमरीवर उतरले आणि सभागृहातील वातावरण तंग बनले. शिवसेनेच्या शाखा या शिवसैनिकांची मंदिरे असून तेथे समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात, असे समर्थन करण्याचा प्रयत्न सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी केला. या गोंधळातच महापौर स्नेहल आंबेकर यांनी पुढील कामकाज पुकारण्यास सुरुवात केले. मात्र तरीही सभागृहात गोंधळ सुरूच होता. अखेर पुढच्या विषयावरील चर्चेची घोषणा महापौरांनी केली आणि या विषयावर पडदा पडला.