गोवरचा प्रादुर्भाव आटोक्यात असला तरी गोवर लसीकरण मोहीम अद्यापही सुरू आहे. गोवर लसीकरणाच्या दुसरा टप्प्याला १५ जानेवारीपासून सुरुवात झाली. मात्र या दुसऱ्या टप्प्यातही मुंबईतील गोवंडी आणि कुर्ला आणि राज्यातील इतर भागातील मालेगाव येथे लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्याचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे. हेही वाचा- Hindustani Bhau :”माझ्या कुटुंबाला आयएसआयकडून जीवे मारण्याची धमकी”, हिंदुस्थानी भाऊचा दावा; केली संरक्षण देण्याची मागणी! मुंबईसह राज्यात नोव्हेंबरपासून गोवरचा उद्रेक झाला. गोवरचा हा उद्रेक आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष कृतीदलाने राज्यात विशेष गोवर रूबेला लसीकरण अभियान राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. या मोहिमेअंतर्गत ९ महिने ते ५ वर्षे या वयोगटातील गोवर रुबेला लसीची मात्रा चुकलेल्या प्रत्येक बालकाला दोन मात्रा २८ दिवसांच्या अंतराने देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यानुसार १५ ते २५ डिसेंबर दरम्यान राज्यात गोवर रूबेला लसीकरणाचा पहिला टप्पा राबवण्यात आला. या पहिल्या टप्प्यात २५ डिसेंबरपर्यंत राज्यात १४ हजार ९२० अतिरिक्त लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले. हेही वाचा- दिल्लीतील संस्थेसाठी राज्य सरकारच्या पायघडय़ा ;सर्व पालिका रुग्णालयांमध्ये ‘जेनेरिक औषधालया’साठी जागा या सत्रांमध्ये गोवर रुबेला लसीची पहिली मात्रा ६२ हजार ९४० बालकांना तर दुसरी मात्रा ६१ हजार ५२७ बालकांना देण्यात आली. मात्र पहिल्या टप्प्यातील लसीकरण मोहिम राबवताना मुंबईतील गोवंडी, कुर्ला आणि मालेगाव शहरात प्रचंड अडचणी आल्या. आता लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला असला तरी या भागात लसीकरण मोहिमेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आमच्यासमोर आहे. तसेच ज्या भागात स्थलांतरित आणि अल्पसंख्याक अधिक आहेत, अशा भागांमध्ये लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करणे जिकरीचे असल्याचे गोवर राज्य कृतीदलाचे प्रमुख डॉ. सुभाष साळुंके यांनी सांगितले. हेही वाचा- सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत बाळाचा गोवरने मृत्यू मुंबईतील काही प्रभाग आणि मालेगावमध्ये लसीकरणाचे उद्दिष्ट गाठणे जिकरीचे असले तरी संबंधित महापालिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार महापालिकेकडून प्रभागांमध्ये विशेष लक्ष दिले आहे. लसीकरण पूर्ण करण्यासाठी महापालिकेकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. विशेष सत्रांचे आयोजन करण्याबरोबरच जनजागृतीवरही भर देण्यात येत असल्याची माहिती डॉ. सुभाष साळुंके यांनी दिली.