मंगल हनवते, लोकसत्ता मुंबई : ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ प्रकल्पाच्या कारशेडचा प्रश्न अधांतरी असला तरी ‘मेट्रो ३’च्या बांधकामासह अन्य कामे मात्र वेगात सुरू आहेत. आता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) मेट्रो गाडय़ा मुंबईत आणण्याची तयारीही सुरू केली आहे. फेब्रुवारी अखेरीस ‘मेट्रो ३’ मार्गासाठीची पहिली गाडी आंध्र प्रदेशवरून मुंबईत दाखल होणार आहे. एमएमआरसीमार्फत ३३.५ किमी लांबीच्या भुयारी ‘मेट्रो ३’ मार्गाचे काम वेगात सुरू आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे एकूण ७१ टक्के काम पूर्ण झाले आहे. भुयारीकरण ९८ टक्के तर रूळ टाकण्याचे काम १८ टक्के पूर्ण झाले आहे. ४२ ब्रेक थ्रू (भुयारीकरण पूर्ण करून टीबीएम मशीन बाहेर काढण्यात आल्या) पैकी ४० ब्रेक थ्रू तर मेट्रो स्थानकाचे ७७ टक्के काम पूर्ण झाले आहे. एकूणच बांधकाम वेगात सुरू आहे. मात्र, मेट्रो गाडय़ा मुंबईत आणण्यास आणि मेट्रो गाडीच्या चाचणीस काहीसा विलंब झाला आहे. पण आता मात्र फेब्रुवारीत मेट्रो ३ प्रकल्पातील पहिली मेट्रो गाडी मुंबईत आणण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरसीतील सूत्रांनी दिली. मेट्रो ३ साठी आंध्र प्रदेश येथील श्री सिटी येथे आठ डब्यांच्या ३१ गाडय़ांची बांधणी करण्यात येत आहे. यातील दोन गाडय़ांची बांधणी पूर्ण झाली असून या गाडय़ा मुंबईत आणण्यासाठी योग्य असल्याची चाचणीही पूर्ण झाली आहे. फेब्रुवारीपर्यंत पहिलीगाडी मुंबईत आणण्यात येईल. त्यानंतर ‘मेट्रो ३’ मार्गावर चाचणी सुरू होईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. तिसऱ्या गाडीची बांधणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. पहिली गाडी लवकरच मुंबईत दाखल होणार असल्याने चाचणीचा मार्ग मोकळा होणार आहे. चाचणीसाठी राज्य सरकारची परवानगी ‘मेट्रो ३’ची कारशेड वादात अडकली आहे. कारशेडची जागा निश्चित नाही. त्यामुळे काम पूर्ण झाले तरी कारशेडचा प्रश्न मार्गी लागल्यानंतरच ‘मेट्रो ३’ प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे. पण असे असले तरी चाचणी मार्गी लावण्यासाठी एमएमआरसीने राज्य सरकारकडून परवानगी मिळवली आहे. मरोळ, मरोशी येथे तात्पुरती कारशेड तयार करून चाचणी घेण्यासाठी परवानगी मिळविण्यात आली आहे. त्यामुळे आता फेब्रुवारीत गाडी आली की त्यानंतर चाचणी होण्याची शक्यता आहे.