मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) बांधकाम आणि पुनर्विकासाबाबत नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्याचप्रमाणे मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रासह राज्यात विकासाचे आणि गृहनिर्माणाचे विविध प्रकल्प सुरू असून यात परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यास त्यांनी तत्वतः मान्यता दिली.

म्हाडाचे राज्यातील विविध प्रकल्प आणि योजनांच्या कामांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हाडामार्फत सुरू असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांमुळे येत्या काही वर्षात सर्वसामान्यांसाठी मुबलक प्रमाणात घरे उपलब्ध होणार आहेत. हे सर्व प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करावेत. बीडीडी चाळीसारख्या ज्या पुनर्वसन प्रकल्पांमध्ये रहिवाशांचे स्थलांतर करणे अपेक्षित आहे ते तातडीने करून प्रकल्पाच्या कामाला गती द्यावी. कामाठीपुरा येथील महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रक्रियेला गती देताना पूल, रस्ते आदी कामांची व्यवहार्यता विचारात घेऊन जोडरस्ते वाढविण्याबाबत विचार करावा, असे सांगितले.

मुंबई महानगर क्षेत्रात म्हाडामार्फत एकूण तीन लाख ७० हजार कोटींच्या १५ विविध प्रकल्पांची कामे सुरू असून या समूह पुनर्विकास प्रकल्पातून एकूण दोन लाख १५ हजारांहून अधिक सदनिका निर्माण होणार असल्याची माहिती उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली. ही सर्व कामे नियोजित वेळेत आणि दर्जेदार करावीत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास प्रकल्पाचे काम म्हाडामार्फत करण्यात येणार असून येथे पहिल्या टप्प्यात समाधी आणि मंदिराच्या कामास तसेच दुसऱ्या टप्प्यात पालखी मार्ग तयार करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभ्युदय नगर, जीटीबी नगर, मोतीलाल नगर, आदर्श नगर, वरळी; वांद्रे रिक्लेमेशन; एसव्हीपी नगर, अंधेरी; कामाठीपुरा, मध्य दक्षिण मुंबई; रामकृष्ण नगर, खार; ओल्ड एमएचबी कॉलनी, बोरिवली; भारतनगर, वांद्रे पूर्व; आराम नगर, वर्सोवा; प्लॉट नंबर सात आणि आठ, वांद्रे; पत्राचाळ, आर १० गोरेगाव; चारकोप, बोरिवली; आणि गोराई, बोरिवली या प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला.