मुंबईत पावसाचा कहर सुरूच असून जनजीवन पुन्हा विस्कळीत झालं आहे. १९ ते २३ जुलै रोजी हवामान विभागाने महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही भागांत डी २,३ स्वरुपाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गेल्या २४ तासांत सकाळी साडेआठ वाजल्यापासून मुंबईच्या सांताक्रूझमध्ये ७० मिमी पावसाची नोंद झाली. मात्र, उपनगराच्या ठाणे आणि इतर भागात २५५ मिमी नोंद करत पावसाने जोरदार हजेरी लावली. हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, येत्या २४ ते ४८ तासांत मुंबईत आणखी जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. असं असताना आता या पावसावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत सेलिब्रिटींना धारेवर धरलं आहे. मुंबईवर संकट ओढावलं असताना सेलिब्रिटी कुठे आहेत?, असा प्रश्न आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

“मुंबईत मुसळधार पाऊस असताना एकाही सेलिब्रिटीने परिस्थितीवर पोस्ट किंवा ट्वीट केलेलं नाही, हे कसं काय?, का फक्त पैशांसाठी त्यांच्या डायलॉगप्रमाणे सर्व पोस्ट स्क्रिप्टसारख्या लिहिलेल्या असतात. कुठे गेलं मुंबईवरचं प्रेम?” असं ट्वीट आमदार नितेश राणे यांनी केलं आहे.

दुसरीकडे मुंबापुरीची पुन्हा तुंबापुरी झाल्याने विरोधकांनी महानगरपालिकेमध्ये आणि राज्यात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. भाजपा आमदार प्रसाद लाड यांनीही ट्विटरवरुन एका जुन्या बातमीच्या आधारे शिवसेनेला टोला लगावला आहे. प्रसाद लाड यांनी, “ये मुंबई है… ये सब जानती है…” असं म्हणत सामना या वेबसाईटच्या २०१७ च्या बातमीचा स्क्रीनशॉर्ट शेअर केला आहे. या स्क्रीनशॉर्टमध्ये सध्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी २०१७ मध्ये मुंबईमध्ये पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं होतं तेव्हा मुख्यमंत्री जबाबदार असल्याचं म्हटलं होतं, असं वृत्त दिसत आहे. “२०१७ मध्ये मुख्यमंत्री जबाबदार… आणि २०२१ मध्ये पाऊस जबाबदार… ऐसा कैसे चलेगा…”, असं ट्विट केलं आहे