मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी दिल्लीत अटक केल्यानंतर आमदार रवी राणा यांनी पांडे यांच्या पापचा घडा भरला होता अशी टीका केली आहे. पांडे यांनी महाविकास आघाडी सरकार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरुन मला आणि खासदार नवनीत राणा यांना हनुमान चालीसा प्रकरणी अटक केली होती. आम्हाला ईडीच्या या कारवाईच्या माध्यमातून न्याय मिळाला असं रवी राणा यांनी म्हटलंय. तसेच त्यांनी शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत, शिवसेना नेते अनिल परबही लवकरच तुरुंगात जातील असंही म्हटलंय.

पांडे यांच्या अटकेनंतर प्रसारमाध्यमांसाठी जारी केलेल्या व्हिडीओमध्ये रवी राणा यांनी हनुमान चालीसा प्रकरणात आपल्याविरोधात गुन्हा दाखल करणारे पोलीस आयुक्त पांडेच होते असं म्हटलंय. “संजय पांडे यांना अटक झाली आहे. त्यांना ईडीच्या माध्यमातून अवैध संपत्ती, अवैध मालमत्ता, अवैध बॅक बॅलेन्स या सगळ्याची चौकशी झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. आम्ही मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालीसा वाचा असून म्हटल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या सांगण्यावरुन आमच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला,” असं रवी राणा यांनी म्हटलंय.

“खासदार नवनीत राणा आणि मला दोन दिवस लॉकअपमध्ये ठेवण्यात आलं. १२ दिवस तुरुंगात ठेवण्यात आलं. लॉकअपमध्ये आम्हाला पाणी प्यायला दिलं नव्हतं, बसायला साधी चटईही दिली नाही. आमच्या घरात पोलीस घुसवून आम्हाला अटक केली. ३५३ सारखा खोटा गुन्हा आमच्यावर दाखल केला. आम्हाला जबरदस्तीने अटक करुन पोलीस स्थानकामध्ये अनेक तास बसवून ठेवण्यात आलं. या सगळ्यामुळे संजय पांडेंचा पापाचा घडा भरला होता. आम्हाला खऱ्या अर्थाने ईडीच्या माध्यमातून न्याय मिळालेला आहे,” असं रवी राणा म्हणालेत.

पाहा व्हिडीओ –

“ज्या पद्धतीने अनिल परब आणि ईडीची चौकशी सुरु आहे ते पाहता येणाऱ्या काळात अनिल परब सुद्धा तुरुंगात जातील. संजय राऊत सुद्धा तुरुंगात जातील,” असा दावा रवी राणांना केलाय.

पांडेंविरोधातील कारवाई का?
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) गैरव्यवहार आणि दूरध्वनी अभिवेक्षण प्रकरणात ‘ईडी’ने पांडे यांची अनेक वेळा चौकशी केली होती. त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित १८ कोटी रुपयांच्या संशयित व्यवहारांबाबत ‘ईडी’ तपास करत आहे. या प्रकरणी ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

याआधी ‘ईडी’ने ‘एनएसई’च्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण, रवी नारायण यांच्यासह संजय पांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. चित्रा रामकृष्ण यांना ‘ईडी’ने अटक केली होती. पांडे यांची दिल्ली ‘ईडी’ने सलग दोन दिवस चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना मंगळवारी अटक करण्यात आली. पांडे यांच्या अटकेच्या वृत्ताला वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला.

संजय पांडे यांनी २००१ साली पोलीस खात्यातील सेवेचा राजीनामा दिल्यानंतर आयसेक सव्‍‌र्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनी सुरू केली होती. त्यावेळी तांत्रिक कारणामुळे त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नव्हता. त्यामुळे त्यांना पुन्हा सेवेत हजर व्हावे लागले. त्यावेळी २००६ मध्ये त्यांनी कंपनीत आपल्या आईला आणि मुलाला संचालक केले. या कंपनीला २०१० ते २०१५ या कालावधीत एनएसई सव्‍‌र्हर आणि संगणकीय यंत्रणा, माहिती तंत्रज्ञान लेखापरिक्षण करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. पण त्या काळात ‘एनएनई’मध्ये गैरव्यवहार झाला होता. याशिवाय आरोपींनी २००९ ते २०१७ या कालावधीत भारतीय टेलिग्राफ कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करून ‘एनएसई’ कर्मचाऱ्यांचे दूरध्वनी अभिवेक्षण करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. दूरध्वनी अभिवेक्षण करण्याच्या कामासाठी आरोपी कंपनीला अंदाजे ४ कोटी ४५ लाख रुपये देण्यात आले होते, असा आरोप आहे.

सीबीआयने संजय पांडेंसह चित्रा रामकृष्ण आणि रवी नारायण यांच्याविरोधात नवीन गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी देशभरातील १८ ठिकाणी सीबीआयने शुक्रवारी छापे घातले होते. या गुन्ह्यांच्या आधारे ‘ईडी’नेही चित्रा रामकृष्ण, रवी नारायण आणि संजय पांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.