मुंबई : सप्टेंबरमध्ये वांद्रे-कुर्ला संकुल येथे उन्नत रस्त्याचे काम सुरू असताना पुलाचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटना प्रकरणाच्या चौकशी अहवालातील शिफारसीनुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने कंत्राटदाराला एक कोटी रुपये, तर सल्लागाराला २० लाख रुपये दंड ठोठावला. एमएमआरडीएमार्फत सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाचे विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाअंतर्गत कुर्ला ते बीकेसी असा उन्नत रस्ता-पूल बांधण्यात येत आहे. सप्टेंबरमध्ये या पुलाचे काम सुरू असताना पहाटे साडेचारच्या सुमारास पुलाचा काही भाग कोसळला. यात १४ जण जखमी झाले. पुलाचा ६५ मेट्रिक टनाचा आणि ८.५ मीटर रुंदीचा स्पॅन (भाग) कोसळला होता. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत या प्रकरणाच्या चौकशीसाठी एमएमआरडीएने त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली होती. समितीत एमएमआरडीए, व्हीजेटीआय आणि आयआयटीमधील प्रत्येकी एका तज्ज्ञ व्यक्तीचा समावेश होता. या समितीने ऑक्टोबरमध्ये चौकशी अहवाल सादर करणे अपेक्षित होते. मात्र हा अहवाल सादर करण्यास विलंब झाला. हा अहवाल सादर झाल्यानंतर त्यातील शिफारसीनुसार एमएमआरडीएने कारवाई करण्यास सुरुवात केली. चौकशी अहवालात कंत्राटदार कंपनी आणि सल्लागाराकडून हलगर्जी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार कंत्राटदाराला एक कोटी रुपये तर सल्लागाराला २० लाख रुपये दंड ठोठावण्यात आल्याची माहिती महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली. तर दंडात्मक कारवाईबरोबरच कंत्राटदार कंपनीतील प्रमुख कर्मचाऱ्यास तसेच सल्लागार कंपनीतील प्रमुख कर्मचाऱ्यास प्रकल्पातून हटविण्याचेही निर्देश देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हा दंड आता या कंपन्यांना भरावा लागणार आहे. बीकेसीतील दुर्घटनाप्रकरणी एमएमआरडीएकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. पण आता रविवारी कांजूरमार्ग येथे मेट्रो ६ प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेप्रकरणीही अशी कडक कारवाई केली जाणार का? असा प्रश्न आहे. रविवारी मेट्रोचे गर्डर बसविताना क्रेन कोळसली आणि यात क्रेनचालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणीही चौकशी सुरू आहे.