मुंबई: मुंबईनजीकच्या गोराई परिसराला मुंबईशी जोडण्याकरीता एमएमआरडीए नवीन पूल बांधणार असून त्याकरीता वनक्षेत्रातील ४.३२ हेक्टर जमीन ताब्यात घ्यावी लागणार आहे. त्यामुळे बाधित होणाऱ्या आदिवासींकडून पालिकेने हरकती, सूचना तसेच दावे मागवले आहेत. गोराई परिसरात तसा फलक लावण्यात आला असून त्याकरीता २ डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे.मुंबईला लागूनच असलेले गोराई हे गाव खाडीमुळे मुंबईपासून तुटलेले आहे. या भागात जाण्यासाठी आजही बोटीने प्रवास करावा लागतो. विकासापासून दूर असलेल्या गोराई गावाला मुंबईशी जोडण्याकरीता चार पदरी पूल बांधण्यात येणार आहे. या पूलाकरीता ४.३२ हेक्टर जागा आरक्षित करण्यात आली असून त्याकरीता कांदळवनेही हटवावी लागणार आहेत. त्यामुळे या परिसरातील आदिवासी, मूळ जमीन मालक यांच्याकडून पालिकेच्या आर मध्य विभागाने हरकती व सूचना मागवल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वन संरक्षण अधिनियम १९८० नुसार पालिकेच्या विभागीय कार्यालयाने कार्यवाही सुरू केली असून बाधित होणाऱ्या जागेतील दावे प्रतिदावे यांच्या हरकती व सुनावणी घेण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्या संस्थांवर आहे. त्यामुळे या हरकती, सूचना व दावे मागवण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त वकार जावेद म. हाफीज यांनी दिली. २ डिसेंबपर्यंत त्याकरीता मुदत देण्यात आली असून त्यावर सुनावणी होऊन मग त्याबाबतचा प्रस्ताव तयार केला जाईल, असेही ते म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mmrda to build a new bridge at gorai to connect mumbai zws
First published on: 28-11-2021 at 02:39 IST