मुंबई : नवी मुंबई विमानतळ नामकरणावरून शिवसेना व स्थानिकांमध्ये सुरू झालेल्या वादामुळे राजकारण पेटलेले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा तोडगा सुचवला आहे. नवी मुंबईतील विमानतळ हा मुंबईतील विमानतळाचा विस्तार असल्याने मुंबई विमानतळाला असलेले शिवाजी महाराजांचे नाव कायम राहावे. नामकरणावरून आता कोण रस्त्यावर उतरते ते बघू, असे सांगत वेळ पडल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलेन, असेही त्यांनी सांगितले. राज यांच्या या तोडग्यावर शिवसेनेने मात्र टीका के ली आहे. नवी मुंबईत उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर शिवसेनेने घेतला. तसा ठराव या प्रकल्पाचे काम पाहणाऱ्या सिडकोकडून मंजूर करण्यात आला. नवी मुंबई विमानतळाला दिवंगत नेते व रायगडचे भूमिपुत्र दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी स्थानिकांनी के ली. त्यासाठी आंदोलन सुरू झाले असून आगरी समाज हा पक्षभेद बाजूला ठेवून एकवटला. नामकरणावरून रस्त्यावर उतरण्याची भाषा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकू र यांनी सोमवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी आहे. तर बाळासाहेबांचे नाव देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यातून संघर्ष होत असून पाठिंबा मागण्यासाठी माझ्याकडे प्रशांत ठाकूर आले होते. हे विमानतळ नवी मुंबईत, पनवेलमध्ये होत असले तरी ते मुंबई विमानतळच असणार आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याने नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळच नाव राहणार असे मला वाटते. सध्याच्या देशांर्तगत विमानतळाचा विस्तारित भाग आहे असे राज यांनी सांगितले. बाळासाहेबांच्या कामाची उंची, त्यांनी मुंबई व महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान-के लेला त्याग पाहता बाळासाहेबांचे नाव देणे उचित आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणतात की नवी मुंबई विमानतळ हा विस्तारित प्रकल्प असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सर्वानाच आदर आहे. पण वस्तुस्थिती तशी नसून नवी मुंबईतील विमानतळ वेगळा-स्वतंत्र आहे. राज ठाकरे यांच्या मनात बाळासाहेबांबद्दल किती प्रेम व आदर आहे हेही या निमित्ताने उघड झाले आहे. बाळासाहेबांचे नाव देण्याचा निर्णय झालेला असताना राज ठाकरे यांनी विनाकारण त्यात कोलदांडा घालू नये. - अरविंद सावंत, मुख्य प्रवक्ते शिवसेना