"आधुनिक अफझल खानानं हिंदुंच्या आणि मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं आहे. याच गोष्टीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बोट ठेवल्यानं त्यांना झालेली पोटदुखी ही अग्रलेखातून दिसत आहे," अशी घणाघाती टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. सामना या वृत्तपत्रातून शिवसेनेनं मनसेच्या भूमिकेवर हल्लाबोल केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. "मुख्यमंत्री ७ मार्चला अयोध्येत जाणार आहेत. त्यांनी प्रभू श्रीरामाचं दर्शन घ्यावं. त्यासाठी आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. जेव्हा प्रभू रामचंद्र त्यांना विचारतील की त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा का सोडला? तेव्हा त्यांनी त्यांच्या उत्तराचा विचार करूनच अयोध्येला जावं," असं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देशपांडे म्हणाले. काय म्हटलं होतं अग्रलेखात? वीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पेलणे हा काही येरागबाळ्यांचा खेळ नाही. तरीही या देशात कुणी हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी नवी घडी बसवत असेल तर त्यांचे स्वागत करण्याची दिलदारी आमच्याकडे आहेच. विचार ‘उसना’ असला तरी हिंदुत्वाचाच आहे. झेपेल तर पुढे जा! संसदीय लोकशाहीत प्रत्येक राजकीय पक्ष आपापले अजेंडे व झेंडे घेऊन काम करीत असतो, पण शिवसेनेसारखा पक्ष ‘एक झेंडा एक नेता’ घेऊन पंचावन्न वर्षे काम करतो आहे. ही एक तपस्या आहे व त्यागही आहे. सत्तेसाठी शिवसेनेने रंग बदलला अशी भाषा करणे हे अकलेची दिवाळखोरी निघाल्याचे लक्षण आहे. शिवसेनेने रंग बदलला असे विचारणाऱ्यांनी स्वतःच्या चेहऱ्यावरील मुखवटे व चेहऱ्यावरचा अनेक रंगी मेकअप तपासून घ्यायला हवा.