मनसेतर्फे आयोजित करण्यात आलेली हनुमान चालिसा रथ यात्रा रद्द करत कारवाईचा बडगा उचलल्याने महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तसंच माहिम विधानसभा अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी नाराजी जाहीर केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी ज्यापद्धतीने काश्मीरमध्ये हिंदूंवर अत्याचार झाले तसेच अत्याचार राज्याचे मुख्यमंत्री आमच्यावर करत आहेत, अशी आमची भावना झाली तर गैर काय? अशी विचारणा केली आहे. आम्ही हिंदुस्थानात आहोत की पाकिस्तानात हेच समजेनासे झालेय असंही ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंकडून शहराध्यक्ष पदावरुन हटवल्यानंतर वसंत मोरेंना फोन करण्यात आल्याचाही उल्लेख केला आहे. पत्रात काय म्हटलं आहे - "सन्माननीय उद्धवजी साहेब रविवारी रामनवमीचे औचित्य साधत महाराष्ट्र सैनिकांनी हनुमान चालिसा रथ यात्रेचे आयोजन केले होते. याचा शुभारंभ मंदिराप्रमाणे असणाऱ्या शिवसेना भवन इथून करण्यात आला. मात्र यावर सरकारने ती रथ यात्रा रद्द करत उलट आमच्यावर कारवाईचा बडगा उचलला. सदर रथ श्रीराम उत्सवाच्या ठिकाणी तसेच राम मंदिराच्या ठिकाणी लावला जाणार होता," असं यशवंत किल्लेदार यांनी सांगितलं आहे. "ज्यापद्धतीने काश्मीरमध्ये हिंदूंवर अत्याचार झाले तसेच अत्याचार राज्याचे मुख्यमंत्री आमच्यावर करत आहेत, अशी आमची भावना झाली तर गैर काय? आम्ही सुद्धा हिंदू आहोत सेनाभवनला शिवसैनिक आणि मुख्यमंत्री मंदिर मानतात मग हनुमान चालीसा लावली तर इतका द्वेष का असावा. आम्ही हिंदुस्थानात आहोत की पाकिस्तानात हेच समजेनासे झालेय. तुम्ही तुमच्या भाषणातून अनेकवेळा आम्ही जनतेच्या हितासाठी हिंदुत्वसाठी महाविकास आघाडी बरोबर एकत्र आलो असल्याचे वक्तव्य केलेत. आमचा मुद्दा एकच जर तुम्ही हिंदुत्वसाठी एकत्र आलात तर मग मनसैनिकांनी हनुमान चालीसा वाजवील्यावर तुम्हाला कारवाई का करावीशी वाटली? जर तुम्ही हिंदुत्ववादी आहात, मग सतत आम्ही हिंदुत्व सोडले नाही असे का बोलावे लागते याचे उत्तर आपण द्याल का?," असा सवाल त्यांनी विचारला आहे. “हॅलो, वसंत मोरे? मुख्यमंत्र्यांना तुमच्याशी बोलायचं आहे”; राज यांनी उचलबांगडी केलेल्या पुण्याच्या माजी मनसे शहराध्यक्षांना फोन "आमचा कुठल्याही धर्माबद्दल अथवा त्यांच्या प्रार्थनेला विरोध नाही मात्र ते ज्या पद्धतीने एकतर्फी कारवाई होत आहे, त्या पद्धतीला विरोध आहे. एरवी आम्ही रमजानच्या दिवसात मुस्लिम बांधवांच्या घरी जातो तसेच गणेशोत्सवात ते आमच्या घरी येतात," असं त्यांनी सांगितंल आहे. "मी संपलेल्या पक्षाबद्दल बोलत नाही अशी टीका टिपणी आदित्य यांनी केली मग पक्ष संपलेला असेल तर तुम्हांला कारवाईचा आधार का घ्यावा लागतो. मनसेच्या वसंत मोरे यांना फोन का करावा लागतो? गेल्या विधानसभा निवडणुकीत माझ्या मित्राच्या फोनवरून मला पक्षात येण्यासाठी फोन करण्याची गरज का भासली? करोडो रुपये खर्च करून नगरसेवक का पळवावे लागतात?," असे सवाल त्यांनी विचारले आहेत. "मनसेची स्थापना झाल्यापासून १६ वर्षे राजसाहेब ठाकरे महाराष्ट्राचा विकास, बेरोजगारी, दुष्काळ, भ्रष्टाचार यावर ओरडेत होते, तेव्हा आपण मनावर घेतले नाही आणि एक भाषण थोडे वेगळे काय केले (त्यातही ते मुद्दे बोलेले होते) लगेच आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना ब्लू प्रिंट, महागाई, बेरोजगारी हे मुद्दे आठवावे लागले," असा टोला यशवंत किल्लेदार यांनी लगावला आहे. "शिवसेनेतील नेते मंडळी समाज माध्यमाच्या माध्यमातून सेनाभवन मध्ये असलेल्या भवानीमातेच्या मंदिरासमोर आरती करण्याचा सल्ला देतात. केवळ म्हणूनच मी या पत्राद्वारे आपणांस विनंती करतो की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांमुळे शिवसेना भवन हे तुमच्यासह सर्व हिंदूचे श्रद्धास्थान (मंदिर) आहे. त्यामुळे शनिवार दिनांक १६ एप्रिल रोजी हनुमान जयंती दिनी सेना भवनमधील भवानीमातेच्या मंदिरात आम्हा मनसैनिकांना हनुमान चालीसेसह आरती करण्याची परवानगी द्यावी," अशी मागणी त्यांनी केली आहे. ठाण्यातील सभेत पुन्हा एकदा 'लाव रे तो व्हिडीओ'; राज ठाकरेंच्या भाषणाची उत्सुकता शिगेला देशात २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकांच्या कालावधीत आपल्या सभांमधून व्हिडीओद्वारे भाजपविरोधात टीकेची झोड उठविणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेत पुन्हा एकदा ‘लाव रे तो व्हिडीओ’ या वाक्याची प्रचिती मनसेच्या कार्यकर्त्यांना घेता येणार आहे. ठाण्यातील सभेमध्ये राज ठाकरे हे व्हिडीओद्वारे विरोधकांवर टिकेचे बाण सोडणार असल्याची माहिती मनसेच्या सुत्रांनी दिली. त्यामुळे राज ठाकरे यांची ठाण्यातील सभा गाजण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांची सभा मंगळवारी ठाण्यातील डाॅ. मूस मार्गावर आयोजित करण्यात आली आहे. ठाण्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. सभेचे फलक, बॅनर यासह मनसेकडून समाजमाध्यमांवर जारी करण्यात आलेल्या लहान चित्रफीतीचा चांगलाच बोलबाला सुरु आहे. दरम्यान, २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळेस लाव रे तो व्हिडीओ म्हणत राज ठाकरे यांनी त्यांच्या सभेमध्ये भाजपविरोधात चित्रीकरण दाखवून टिकेची झोड उठवली होती. ठाण्यातील सभेमध्येही अशाचप्रकारे ‘लाव रे तो व्हिडीओ’ हे वाक्य पुन्हा एकदा ऐकालया मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.