मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपण सुधारित नागरिकत्व कायद्याला (सीएए) समर्थन केलं नसल्याचं सांगितलं आहे. आपल्या वक्तव्याच्या प्रसारमाध्यमांकडून चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. माझं सीएएला समर्थन नसून बेकायदा पाकिस्तानी, बांगलादेशी मुसलमानांना हाकला असं म्हणालो होतो. पण याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. सीएए आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीला (एनआरसी) पाठिंबा देण्यासंबंधी मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये मतांतर असून नेमकी भूमिका स्पष्ट करण्यासाठीच ही बैठक बोलावण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

मनसेच्या पहिल्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशातून लाखो मुसलमानांनी भारतात घुसखोरी केली असून, त्यांना हाकलून देण्याची गरज आहे. त्यासाठी ९ फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावर मोर्चा काढण्याची घोषणा करत राष्ट्रीय नागरिक नोंदणीला (एनआरसी) अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शवला होता.

आणखी वाचा – राज्यात ‘सीएए’विरोधात ठराव होणं शक्य नाही; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे स्पष्टीकरण

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते ?
भारत ही धर्मशाळा नाही. त्यामुळे येथे पाकिस्तान आणि बांगलादेशातून येणाऱ्या मुसलमानांना हाकलूनच दिले पाहिजे. सध्या जे काही लोक मोर्चे काढत आहेत त्यांना मोर्चा काढूनच उत्तर दिले जाईल, असे सांगत ९ फेब्रुवारी रोजी मनसेच्या मोर्चाची घोषणा राज ठाकरे यांनी केली. सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत चर्चा होऊ शकते. मात्र, बाहेरून आलेल्यांना कशासाठी पोसायचे, असा सवाल करीत बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरी हाकलण्यासाठी केंद्राला पाठिंबा देण्याची आपली तयारी असल्याचे राज यांनी सांगितले होते.