लवकरच मध्य व पश्चिम रेल्वेवर सर्वेक्षण; ‘क्रिस’च्या संचालकांच्या अधिकाऱ्यांना सूचना

उपनगरीय प्रवाशांच्या अत्यंत सोयीच्या अशा कागदविरहित मोबाइल तिकीट प्रणालीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याने ही प्रणाली विकसित करणाऱ्या सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टीमने (क्रिस) आता प्रवासी सर्वेक्षणाचा मार्ग अवलंबला आहे. मोबाइल तिकीट प्रणाली सुरू होऊन आता जवळपास वर्ष होत आले, तरीही या प्रणालीद्वारे तिकीट काढणाऱ्यांची दैनंदिन संख्या दीड हजारांपर्यंतही पोहोचलेली नाही. त्यामुळे आता मध्य व पश्चिम रेल्वेने त्यांच्या प्रवाशांमध्ये सर्वेक्षण करावे, अशा सूचना ‘क्रिस’ने पत्राद्वारे केल्या आहेत. हे सर्वेक्षण लवकरच सुरू होणार आहे.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी डिसेंबर २०१४च्या अखेरीस मोबाइल तिकीट प्रणालीचे लोकार्पण केले होते. मात्र कागदविरहित मोबाइल तिकीट प्रणाली सुरू व्हायला वेळ लागला होता. ९ ऑक्टोबर रोजी सुरू झालेल्या या प्रणालीच्या प्रचारासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने विविध उपक्रम हाती घ्यावेत, अशी सूचना त्या वेळी ‘क्रिस’ व रेल्वे मंत्रालय यांनी केली होती.

पण मध्य रेल्वेने लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी एक पथनाटय़ वगळता प्रवाशांच्या जागृतीसाठी काहीच केलेले नाही. पश्चिम रेल्वेनेही मोबाइल तिकीट प्रणालीच्या प्रचारासाठी काहीच उपाय योजलेले नाहीत. मध्य रेल्वेच्या सांस्कृतिक शाखेने मोबाइल तिकीट प्रणालीच्या प्रचारासाठी एक श्राव्य माध्यमातील जाहिरात तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. मात्र ही जाहिरात प्रवाशांच्या कानांवर पडलेली नाही.

मध्य व पश्चिम रेल्वेच्या या भूमिकेमुळे प्रवाशांनीही मोबाइल तिकीट प्रणालीकडे पाठ फिरवली आहे. दैनंदिन ७५ लाख एवढी प्रवासी संख्या असलेल्या उपनगरीय रेल्वेमार्गावर फक्त दीड हजार लोक मोबाइल तिकीट प्रणालीचा वापर करतात.

तर मासिक वा त्रमासिक पास काढण्यासाठीही तेवढय़ाच प्रवाशांनी या प्रणालीचा वापर केला आहे. हा आकडा एकूण प्रवासी संख्येच्या एक टक्काही नाही. त्यामुळे ही लोकोपयोगी तिकीट प्रणाली अपयशी ठरल्याचे दृश्य आहे.

पण आता ‘क्रिस’च्या दिल्ली येथील संचालकांनी मध्य व पश्चिम रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (प्रवासी विपणन) यांना पत्र लिहून मोबाइल तिकीट प्रणालीबाबत सर्वेक्षण करण्यास सांगितले आहे.

या सर्वेक्षणात प्रवाशांना ‘तुम्हाला मोबाइल तिकीट प्रणाली व अ‍ॅपबद्दल माहिती आहे का?’, ‘तुम्ही अ‍ॅप वापरता का?’, ‘वापरत नसल्यास का वापरत नाही?’, ‘वापरत असल्यास, आणखी काय सुधारणा हव्यात?’ अशा प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. हे सर्वेक्षण लवकरच होणार असल्याचे ‘क्रिस’मधील सूत्रांनी सांगितले.