शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या दसरा मेळवातून भाजपा, पंतप्रधान मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आजच्या विजयादशमी उत्सवात सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या भाषणावरून देखील टिप्पणी केली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधल्याचे दिसून आले.

… पण असं पोषक वर्तन सत्तेत बसलेल्यांचंही होताना दिसत नाही, मग जनतेला कशी दिशा मिळणार? : मोहन भागवत

उद्धव ठाकरे म्हणाले, “ हल्ली काय झालेलं आहे केवळ बोलत जायचं. टीका करायची, विचारांचा पत्ता नाही. कशात काही नाही, एकचा पायपोस दुसऱ्यास नाही. आज देखील जे मोहन भागवातांचे जे विचार आहेत. त्यांनी सांगितलं आहे की, हिंदुत्व म्हणजे काय? आणि हे खरंय त्यात काही चूक नाही. की या आपल्या देशात सर्वांचे पूर्वज हे एक होते. आता एकदम पूर्वजापर्यंत मी जात नाही नाहीतर माकडापर्यंत पोहचू आपण. पण या देशापुरता जरी विचार करायचा झाला, तर सर्वांचे पूर्वज एक होते, आहेत हे जर आपल्याला मान्य असेल. तर मग विरोधी पक्षांचे पूर्वज काय परग्रहांवरून आले होते का? आता जे शेतकरी आंदोलन करत आहेत, त्यांचे पूर्वज का परग्रहावरून आले होते का? लखीमपूरला जे शेतकरी दिवसा ढवळ्या मारले, त्यांचे पूर्वज काय परग्रहावरून आले होते? हा जो काही विचार आहे की आपण सर्व एक आहोत, हिंदुत्व म्हणजे काय आम्ही दुसऱ्यांचा द्वेष, मत्सर करत नाही. पण हे जे दिवसा ढवळ्या दिसतय हे मोहनजी तुम्हाला तरी पटतंय का? तुम्हाला तरी मान्य आहे का? मी जनतेला विचारतोय तुम्हाला तरी मान्य आहे का?”

“ …तर कदाचित मी राजकीय जीवनातून बाजूला देखील झालो असतो ” ; उद्धव ठाकरेंचं विधान!

तसेच, “सर्वसामान्य माणासाला मला हेच सांगायचं आहे. की अरे तू सगळ्यात ताकदवान माणूस आहेस. तुझ्या हातात लोकाशाहीने दिलेलं जे शस्त्र आहे, ते आहे मत. हे मत एका क्षणात रावाचा रंक आणि रंकाचा राव करू शकतं, एवढी ताकद तुझ्या मनगटात आहे, तू दुबळा नाही.” असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

“ तुम्ही चिरकत रहा पण माझा वाडा चिरेबंद आहे ” ; उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर निशाणा!

सरसंघचालकांच्या भाषणाबद्दल पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, “त्यांनी पुढे जे काय सांगितलं की, हिंदू राष्ट्र हा शब्द जेव्हा वापरतो तेव्हा त्यामध्ये सत्तापिपासूपणा नसतो. त्यामध्ये सत्ता मिळवण्याची लालसा नसते. तर सर्व समावेशक अर्थाने हा शब्दसंग्रह वापरत असतो. सत्तेसाठी संघर्ष करताना विवेक वापरावा. वैचारीक लढा हवा, युद्ध नको. मग तुमच्या विचारधारेतून तुमच्या वर्गातून जी आता लोक बाहेर पडलेली आहेत आणि सत्ता काबीज करून बसलेली आहेत, त्यांनाही शिकवणी परत लावा जरा एकदा. सध्या जो काय सगळा खेळ सुरू आहे, वाटेल ते करायचं पण मला सत्ता पाहिजे. व्यसनाधिनता हा जो एक प्रकार आहे, अंमली पदार्थ हा एक वेगळा भाग झाला. त्याचा तर नायनाट केलाच पाहिजे. पण सत्तेचं व्यसन हा देखील एक अंमली प्रकारच आहे.”

“आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही, दाबणारा कधीच जन्माला येणार नाही”

याचबरोबर, “अगदी बाजार उद्यान समित्यांपासून लोकसभेपर्यंत सर्वकाही माझ्याच अंमलाखाली पाहिजे, हा देखील एक अंमली प्रकारच आहे. या अंमली प्रकाराचा बंदोबस्त कोण करणार? कोणी करायचा? आज ज्या पद्धतीने एक-एक प्रकार सुरू आहेत, काय वाटेल ते करा. आता पुढील महिन्यात तुमच्या आशीर्वादातून या आपल्या हक्काच्या सरकारला दोन वर्षे पूर्ण होतील. अनेक प्रयत्न केले. फोडण्याचे प्रयत्न केले, पाडण्याचे प्रयत्न केले. मी तर आज देखील सांगतो हिंमत असेल तर पाडून दाखवा, आजपण सांगतो मी. पण तसं करून पडत नाही. मग आपल्याकडे जसा छापा की काटा खेळ आहे, तसा छापा टाकायचा आणि काटा काढायचा. छापा की काटा? मग तिकडून विचारतात टाकला छापा, काढला काटा? ही थेरं जास्त चालू नाही शकत.” असं देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवलं.