मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यानेही अटकपूर्व जामिनासाठी विशेष सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. मात्र ऋषिकेश याच्याकडून तपासात कोणतेही सहकार्य केले जात नसल्याचा दावा करून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांच्या  अर्जाला विरोध केला. त्याची दखल घेत विशेष न्यायालयाने ऋषिकेश याच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी २९ सप्टेंबपर्यंत स्थगित केली व देशमुख यांना तूर्तास कोणताही दिलासा देण्यास नकार दिला.

हेही वाचा >>> मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महाराष्ट्रातील तरुणांची माफी मागतील का? जयंत पाटलांचा सवाल

आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी देशमुख सध्या अटकेत आहेत. या प्रकरणी ऋषिकेश यांनाही समन्स बजावण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर ऋषिकेश यांनी विशेष न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. ईडी या प्रकरणात आपल्याला जाणीवपूर्वक अडकवत असून पूर्वग्रहदूषित पद्धतीने तपास सुरू असल्याचा दावा ऋषिकेश यांनी केला आहे.