मुंबई : मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्यामुळे यंदा मोसमी पाऊस काहीसा लवकर दाखल होण्याची शक्यता आहे. दक्षिण अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात मोसमी पाऊस १३ मे रोजी दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरवर्षी सरासरी २२ मे रोजी मोसमी पाऊस अंदमानात दाखल होतो, यंदा आठ दिवस अगोदरच दाखल होण्याची शक्यता आहे.
नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्यामुळे यंदा आठ दिवस अगोदरच मोसमी पाऊस दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात दाखल होण्याची शक्यता आहे. दरवर्षी २२ मे दरम्यान मोसमी पाऊस अंदमानात दाखल होतो, यंदा नैर्ऋत्य मोसमी पाऊस मलेशिया, सिंगापूर, सुमात्रा बेटाचा उत्तरेकडील भाग ओलांडून भारताच्या अंदमान व निकोबार बेटांच्या दक्षिणेकडील आग्नेय बंगालच्या उपसागरात तो १३ मे रोजी दाखल होण्याची शक्यता आहे.
अंदमानात मोसमी पाऊस आठ दिवस अगोदरच दाखल होण्याचा अंदाज असला तरीही अद्याप देशाच्या मुख्य भूभागात म्हणजे केरळमध्ये कधी दाखल होईल, या बाबत आताच ठोस सांगता येणार नाही. हवामान विभागाने १५ मे रोजी त्या बाबत अधिकृत घोषणा करेल, अशी माहिती हवामान विभागातून देण्यात आली.
दरम्यान, राज्यात उन्हाळी पाऊस आणि गारपिटीचे वातावरण कायम आहे. उर्वरित महाराष्ट्राबरोबरच, मुंबईसह कोकणातही पुढील दोन दिवस आणि मराठवाड्यातही पुढील तीन दिवस पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. पश्चिमेकडून म्हणजे अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण निर्माण होऊन कमाल तापमानात घट झाली आहे. ढगाळ हवामानामुळे राज्यात रात्रीचा उकाडा किंवा उष्णतेच्या लाटेची स्थिती सध्या कुठेही जाणवत नाही.
आज गारपिटीचा धोका हवामान विभागाने बुधवारी राज्यभरात वादळी वारे, मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सातारा, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगरला नारंगी इशारा दिला आहे. या जिल्ह्यांत गारपिटीचा धोका जास्त आहे. वाशिम, बुलढाणा, अकोला आणि अमरावती वगळता उर्वरीत महाराष्ट्राला पिवळा इशारा देण्यात आला आहे.