रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टरच टीबीसारख्या आजाराचे बळी ठरत असल्याबद्दल विधान परिषदेत सोमवारी सर्वपक्षीय सदस्यांनी चिंता व्यक्त केली. वसतिगृहांची अस्वच्छता, राहण्याची अपुरी जागा आदी असुविधांमुळे डॉक्टरांचेच आरोग्य धोक्यात आले आहे, याकडे या सदस्यांनी सरकारचे लक्ष वेधले. त्यावर निवासी डॉक्टरांसाठी जादा वसतिगृहे बांधण्याचे तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी खास निधीची तरतूद करण्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले.
विधान परिषदेत अलका देसाई यांनी मुंबईतील शासकीय व महापालिका रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांना तोंड द्यावे लागत असलेल्या विविध समस्यांचा पाढा वाचला.
सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची दखल घेत निवासी डॉक्टरांच्या राहणीमानाकडे व त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यात येईल, असे आश्वासन गावित यांनी दिले. निवासी डॉक्टरांची संख्या वाढली असल्याने सध्याची वसतिगृहे कमी पडत आहेत, असे त्यांनी मान्य केले. त्यामुळे आता एका खोलीत दोन डॉक्टर राहतील, अशा प्रकारे आणखी जादा वसतिगृहे बांधण्यात येतील. त्याचबरोबर महिन्यातून एकदा डॉक्टरांची आरोग्य तपासणी केली जाईल, असेही गावित यांनी सांगितले.