मुंबई: दिवा - पेण - दिवा मार्गावर मेमू गाड्यांच्या आणखी फेऱ्या वाढविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या मार्गावर ५ जुलैपासून चार फेऱ्या होतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. करोनाकाळात दिवा - पेण - दिवा मेमू गाड्यांची सेवा बंद होती. कमी झालेली रुग्णसंख्या आणि शिथिल झालेले निर्बंध लक्षात घेऊन ऑक्टोबर २०२१ पासून या मार्गावर चार मेमू गाड्यांच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. आता आणखी चार फेऱ्यांची त्यात भर पडली आहे. शनिवार, रविवार वगळता उर्वरित पाच दिवस मेमू धावणार आहे. दिव्याहून पनवेलसाठी सकाळी ९.४० वाजता, पेणहून दिव्यासाठी सकाळी पावणेसात वाजता, दिव्याहून पेणसाठी रात्री ७.५० वाजता आणि पेणहून दिव्यासाठी सायंकाळी ६.०५ वाजता गाडी सोडण्यात येणार आहे. दातिवली, निळजे, तळोजे पाचंद, नावाडे रोड, कळंबोली रोड, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आप्टे, जिते, हमरापूर येथे गाड्यांना थांबा असेल. या गाड्या बारा डब्यांच्या असतील.