‘एमपीएससी’च्या उमेदवारांची वयोमर्यादा शिथिल

मुंबई : करोनाकाळात स्पर्धा परीक्षांसाठी वर्षभर जाहिरात प्रसिद्ध न झाल्यामुळे वयाच्या निकषात बसू न शकणाऱ्या उमेदवारांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. यंदा होणाऱ्या परीक्षांसाठी वयोमर्यादा शिथिल करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. 

 राज्य लोकसेवा आयोग व निवड मंडळांच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना एक वर्षाची वयोमर्यादा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राज्यातील परीक्षार्थींना मोठा दिलासा मिळाल्याचे सामान्य प्रशासन खात्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

करोनाकाळात गेले वर्षभर नोकर- भरतीसाठी स्पर्धा परीक्षांच्या जाहिराती निघाल्या नाहीत. त्यामुळे या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांची वयोमर्यादा उलटली होती. त्यामुळे किमान दोन वर्षांची वयोमर्यादा वाढविण्याची मागणी राज्यभरातून होत होती. या पार्श्वभूमीवर पुढील काळात नोकर- भरतीसाठी होणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी उमेदवारांना वयोमर्यादा वाढवून द्यावी; जेणेकरून त्यांना अतिरिक्त संधी उपलब्ध होऊ शकेल, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी १३ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत के ली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संपूर्ण मंत्रिमंडळाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सामान्य प्रशासन विभागाला याबाबत अहवाल व आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानंतर वयोमर्यादा शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षार्थींसाठी एक वर्षाची मुदत शिथिल करण्याच्या निर्णयाबद्दल बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचे आभार मानले.

निर्णय काय?

राज्य लोकसेवा आयोग तसेच निवड मंडळांच्या पुढील जाहिरातींमध्ये एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या १९ नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू होणार आहे.