मुंबई : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांपूर्वी मुंबई येथील इंदू मिलच्या जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक पूर्ण करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. त्यानुसार स्मारकाचे काम करणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) ३१ मार्च २०२४ ही मुदत देण्यात आली आहे. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक निर्धारित वेळेत व अत्यंत दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा काम करत आहेत. राज्य शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी आवश्यक निधीदेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार मार्च २०२४ पर्यंत या स्मारकाचे काम पूर्ण करणे अपेक्षित असल्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. या वेळी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षां गायकवाड, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, तसेच सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवासन, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे व इतर अधिकारी उपस्थित होते.

या वेळी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत एमएमआरडीएच्या वतीने महानगर आयुक्त श्रीनिवासन यांनी स्मारकाच्या कामाचे सादरीकरण केले. त्याचबरोबर प्रत्यक्ष भेट देऊन स्मारकाचे प्रवेशद्वार, स्मारक इमारत, व्याख्यान वर्ग, ग्रंथालय, प्रेक्षागृह, तळघर वाहनतळ, याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली  मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. समितीत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांचा समावेश आहे.