मुंबई : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील आणखी एका महत्त्वाच्या टप्प्याची यशस्वी पूर्तता झाली असून, पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात अंबेसरी गावाजवळील तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचे ‘ब्रेकथ्रू’ पूर्ण करण्यात आले. आता महाराष्ट्रातील बुलेट ट्रेन मार्गिकेच्या बांधकामाला आणखी वेग आला आहे.
‘माउंटन टनेल ७’ (एमटी)
म्हणून ओळखला जाणारा हा बोगदा ४१७ मीटर लांबीचा आणि १४.४ मीटर रुंदीचा असून, अप आणि डाऊन अशा दोन्ही बुलेट ट्रेन ट्रॅकसाठी त्याची रचना करण्यात आली आहे. बोगद्याचे उत्खनन दोन्ही टोकांवरून नियंत्रित ड्रिलिंग आणि ब्लास्टिंग पद्धतीने करण्यात आले.
उत्खननादरम्यान सुरक्षितता आणि संरचनेची स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. कंपन, भू-संरचना आणि परिसरातील परिणामांवर सतत लक्ष ठेवण्यासाठी ‘सरफेस सेटलमेंट पॉइंट्स’ (एसएसपी), ‘थ्रीडी टार्गेट्स’, ‘स्ट्रेन गेजेस’ आणि ‘सिस्मोग्राफ्स’ यांसारख्या प्रणाली बसवण्यात आल्या होत्या.
कामगारांच्या सुरक्षिततेसाठी बोगद्यात प्रभावी वायुवीजन व्यवस्था, अग्निसुरक्षा उपाय, नियंत्रित प्रवेश व्यवस्था आणि सातत्यपूर्ण भू-तांत्रिक निरीक्षण यावर विशेष भर देण्यात आला होता. मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील एकूण आठ पर्वतीय बोगद्यांपैकी सात बोगदे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात, तर एक बोगदा गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात आहे. यापैकी ‘एमटी ८’चे (३५० मीटर) ब्रेकथ्रू ऑक्टोबर २०२३ मध्ये, ‘एमटी ५’चे (१.५ किमी) जानेवारी २०२६ मध्ये आणि ‘एमटी ६’चे (४५४ मीटर) फेब्रुवारी २०२६ मध्ये पूर्ण झाले होते. आता ‘एमटी ७’च्या यशस्वी पूर्ततेमुळे गेल्या पाच महिन्यांत महाराष्ट्रातील तीन पर्वतीय बोगद्यांचे उत्खनन पूर्ण झाले आहे.
दरम्यान, ‘एमटी ४’मध्ये सुमारे ६० टक्के, तर ‘एमटी ३’मध्ये ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून ‘एमटी १’ आणि ‘एमटी २’चे कामही वेगात सुरू आहे. विशेष म्हणजे, वापी आणि बोईसर या औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरांदरम्यान असलेले सर्व तीन पर्वतीय बोगदे ‘एमटी ६’, ‘एमटी ७’, ‘एमटी ८’ यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवरील बुलेट ट्रेन मार्गिकेच्या बांधकामाला मोठी चालना मिळाली असून संपूर्ण विभागात कामे वेगाने सुरू आहेत, अशी माहिती ‘नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन’कडून देण्यात आली.
मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात गुजरातमध्ये ८ आणि महाराष्ट्रात ४ अशी एकूण १२ स्थानके आहेत. यामध्ये वांद्रे-कुर्ला संकुल, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती या स्थानकांचा समावेश आहे. प्रत्येक स्थानकाचे काम वेगवेगळ्या टप्प्यात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दोन्ही राज्यांमधील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
