मुंबईः मुंबई विमानतळावर विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. विमानतळ प्राधिकरणाने तात्काळ याबाबतची माहिती सर्व यंत्रणांना दिल्यानंतर विमानाची तपासणी करण्यात आली. पण विमानात काहीही संशयास्पद सापडले नाही. याप्रकरणी धमकीचा दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सहार विमानतळ हॉटलाइनवर धमकीचा दूरध्वनी आला होता. त्यात इंडिगो कंपनीच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने दिली होती. ते विमान चंदीगडहून मुंबईला येणार होते. रात्री उशिरा विमान मुंबई विमानतळावर उतरले. त्यानंतर विमानतळातील मोकळ्या जागी नेऊन त्याची तपासणी करण्यात आली. पण विमानात काहीही संशयास्पद सापडलेले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणाची माहिती पोलिसांंना देण्यात आली आहे. पोलीस दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. याबाबत गुन्हे शाखाही समांतर तपास करत आहे.

धमक्यांचे सत्र सुरूच

ऑक्टोबर महिन्यापासून देशातील सर्वच विमानतळांवर तसेच विमान कंपन्यांना धमक्यांचे संदेश व दूरध्वनी प्राप्त व्हायला सुरूवात झाली. ऑक्टोबरच्या पहिल्या १५ दिवसांतच धमक्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली होती. बहुतांश संदेश समाज माध्यमांद्वारे पाठवण्यात आले असून त्यात विमान कंपन्या, स्थानिक पोलीस, विमानतळ प्राधिकरण यांना ईमेल अथवा संदेश पाठवून धमक्या देण्यात आल्या आहेत.ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात एकाच दिवसात ८५ नवीन धमक्या आल्या होत्या. तसेच त्यापूर्वी १५ दिवसांतच ७० हून अधिक धमकीचे संदेश प्राप्त झाले होते. प्रत्येक विमानांची व प्रवशांची सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करण्यात आली. तपासणीत सर्व धमक्या अथवा संदेश खोटे असल्याचे निष्पन्न झाले.

धमक्यांमुळे यापूर्वी विमानांच्या उड्डाणांवर परिणाम

समाज माध्यमांद्वारे पाठवण्यात आलेल्या या धमक्यांमुळे गेल्यावर्षी देशभरातील ५१० उड्डाणांवर परिणाम झाला आहे. महिन्याभरात नोंदवण्यात आलेला हा उच्चांक असून मुंबईतच याबाबत १६ हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. या धमक्यांमुळे सुरक्षा यंत्रणा, प्रवासी व विमान कंपन्या सर्वांनाच त्रासाला सामोरे जावे लागले. विशेष करून या धमक्यांमुळे विमान कंपन्यांच्या खर्चातही किमान २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. नेहमीच्या धमक्यांमुळे सुरक्षा यंत्रणांचे काम अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.

सुरक्षा यंत्रणांनी कार्यपद्धतीत बदल

धमक्यांच्या संदेशांमुळे विमानतळावरील सुरक्षा अधिकाधिक आव्हानात्मक व गुंतागुंतीची बनली आहे. धमक्यांसाठी विशेषतः समाजमाध्यमांचा वापर होत असल्यामुळे आता विमानतळ सुरक्षा यंत्रणांनी या धमक्यांचे मूल्यमापन करताना बहुस्तरीय दृष्टिकोन अवलंबण्याचा तसेच धमकीच्या विश्वासार्हतेची व गंभीरतेची खात्री करण्यासाठी विविध घटकांचा विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी धमकीला ‘विशिष्ट’ किंवा ‘अविशिष्ट’ म्हणून वर्गीकृत करण्यापूर्वी, तिच्या माहितीच्या स्रोताची विश्वासार्हता विचारात घेण्याच्या सूचना सुरक्षा रक्षकांना करण्यात आल्या आहेत. गेल्यावर्षी कार्यप्रणालीत सुरक्षा यंत्रणांनी अनेक बदल केले.