मुंबई : एप्रिल महिन्यात देशांतर्गत प्रवासी वाहतुकीत बंगळुरू विमानतळाने मुंबईला मागे टाकले असले तरी मुंबई विमानतळाने आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत दुसरे स्थान कायम राखले आहे. बंगळुरू विमानतळ आता देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात व्यस्त देशांतर्गत विमानतळ बनले आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार, मुंबई विमानतळावरील २८.९ लाख देशांतर्गत प्रवाशांच्या तुलनेत बंगळुरू विमानतळावरून ३२.८ लाख प्रवाशांनी ये-जा केली.
यंदा बंगळुरूने देशांतर्गत प्रवासी संख्येत मुंबईला मात दिली असली तरी आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत मुंबईचे एकूण क्रमवारीत दुसरे स्थान कायम राहिले आहे. एप्रिलमध्ये बंगळुरूच्या ३६.८ लाख प्रवाशांच्या तुलनेत मुंबई विमानतळाने सुमारे ४० लाख प्रवाशांची वाहतूक केली. सर्व निकषांत दिल्ली हेच भारतातील सर्वात व्यस्त विमानतळ म्हणून मोठ्या फरकाने आघाडीवर आहे.
देशांतर्गत क्रमवारीत झालेला हा बदल पूर्णपणे नवीन नाही. २०२० आणि २०२१ मध्ये कोरोना काळातही, काही विशिष्ट महिन्यांत बंगळुरूने मुंबईला मागे टाकले होते. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केवळ एकाच धावपट्टीवर कार्यरत असल्याने, विमानांच्या उड्डाणांसाठीच्या ‘स्लॉट्स’ची (वेळांची) क्षमता पूर्णपणे संपली आहे. त्यामुळे, मुंबई महानगर प्रदेशातून होणारी देशांतर्गत प्रवाशांची अतिरिक्त वाढ आता नव्याने कार्यान्वित झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाद्वारे सामावून घेतली जात आहे. एकत्रितपणे पाहता, महानगर क्षेत्राला सेवा देणाऱ्या या दोन्ही विमानतळांवरून एप्रिल महिन्यात सुमारे ३४ लाख देशांतर्गत प्रवाशांनी प्रवास केला. एप्रिल महिन्यात, मुंबईच्या देशांतर्गत प्रवासी वाहतुकीत वार्षिक तुलनेत १२ टक्के घट झाली. याउलट बंगळुरूमध्ये केवळ ०.८ टक्के घट नोंदवली, तर दिल्लीच्या प्रवासी वाहतुकीत १.८ टक्के वाढ झाली.
एप्रिलची प्रवासी संख्या (दशलक्ष)
शहर – देशांतर्गत – आंतरराष्ट्रीय – एकूण
दिल्ली – ४.९ – १.७ – ६.६
मुंबई – २.९ – १.२ – ४
बंगळुरू – ३.२ – ०.५ – ३.७
विमानांची संख्या (हजारात)
दिल्ली – ४१,६०८
मुंबई – २५,६०६
बंगळुरू – २३,६६८
नवी मुंबईमुळे मुंबईची प्रवासी संख्या घटली
गेल्या डिसेंबरमध्ये सुरू झालेल्या नवी मुंबई विमानतळावर देशांतर्गत विमानसेवा स्थलांतरित करणे, हे मुंबई विमानतळावरील देशांतर्गत वाहतुकीत घट होण्याच्या मुख्य कारणांपैकी एक आहे. नवीन विमानतळावर सध्याच्या उन्हाळी वेळापत्रकात वाहतुकीत प्रचंड वाढ झाली आहे.
नवी मुंबई विमानतळ १० व्या स्थानावर
नवी मुंबई विमानतळाने एप्रिल महिन्यात ५.२४ लाख प्रवाशांची हाताळणी केली असून, मार्च महिन्यातील प्रवासी संख्येच्या तुलनेत २.३ पटीने वाढ नोंदवली आहे. हे विमानतळ आता देशातील देशांतर्गत हवाई वाहतुकीच्या दृष्टीने १० वे सर्वात व्यस्त विमानतळ बनले आहे. ‘इंडिगो’ सारख्या विमान कंपन्यांनी काही देशांतर्गत मार्ग मुंबईहून नवी मुंबई विमानतळाकडे वळवले आहेत. यापूर्वी मुंबई विमानतळावरून चालवले जाणारे आणि केवळ मुंबईहूनच सेवा पुरवणारे काही मार्ग आता केवळ नवी मुंबई विमानतळावरूनच चालवले जात आहेत. यात अयोध्या, आग्रा, हिंडन, जबलपूर आणि तिरुपती या मार्गांचा समावेश आहे.
