मुंबई : भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाल्यामुळे मुंबईत फटाके वाजवण्यावर आणि रॉकेट उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश मुंबई पोलिसांनी जारी केले असून आदेशानुसार ही बंदी ११ मेपासून ९ जूनपर्यंत असेल.ऑपरेशन सिंदूरनंतर मुंबईत सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सरकारी आस्थापना, संवेदशील ठिकाणे व धार्मिक स्थळे, परदेशी वकिलाती व रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

संवेदनशील ठिकाणी बॉम्ब शोधक व नाशक पथकामार्फत तपासणी करण्यात आली. रेल्वे पोलिसांनी मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर घातपात विरोधी तपासणी करण्यात आली. त्यात चर्चगेट, सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला, मुंबई सेंट्रल, अंधेरी, चेंबूर, गोवंडी, बोरिवली या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. यावेळी पोलिसांनी ठिकठिकाणी रुटमार्च केला. रेल्वे स्थानकांवरील पूल, फलाट, अडगळीची ठिकाणे, संशयीत व्यक्ती व बॅगांची तपासणी करण्यात आली.

विशेष करून लांबपल्ल्यांच्या वाहनांची सुरक्षा तपासणी करण्यात आली. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत फटाके वाजवून नयेत, तसेच रॉकेट उडवून नये, असे आदेश मुंबई पोलिसांनी जारी केले आहेत. उपायुक्त (अभियान) अकबर पठाण यांनी याबाबतचे आदेश जारी केले असून ही बंदी ११ मेपासून ९ जूनपर्यंत आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १० मधील पोटकलम २ अंतर्गत मिळालेल्या अधिकाराअंतर्गत उपायुक्तांनी हे आदेश जारी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना सर्व पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

नागरिकांना आवाहन

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. त्यात स्थानक परिसरात असताना काही संशयीत आढळल्यास त्याची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी. देशातील घडामोडींच्या अनुषंगाने काही समाजकंटकामार्फत अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस मित्र म्हणून पोलीस प्रशासनास मदत करावी. परिसरात कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होणाऱ्या लहान- मोठ्या गोष्टीबाबत माहिती पोलीस प्रशासनास द्यावी. समाज माध्यमांवरील आक्षेपार्ह मजकूर प्रसारित होत असून त्यावर आपण कोणीही विश्वास ठेवू नये. तसेच असे मजकूर प्रसारित होत असतील तर त्याबाबत पोलीस प्रशासनास माहिती दयावी. संशयीत इसमाच्या हालचालींवर लक्ष ठेऊन त्याची माहिती पोलिसांना द्यावी, बेवारस बॅग, संशयास्पद वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, तसेच संशयास्पद व्यक्ती अगर हालचाली दिसल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.