मुंबई : पावसाला मे महिन्यापासूनच सुरू झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा जूनमध्ये साथीच्या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यामध्ये हिवताप व अतिसाराच्या रुग्णांची संख्या अधिक असून, अतिसाराचे ९३६, तर हिवतापाचे ८८४ रुग्ण सापडले आहेत. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी जूनमध्ये तब्बल १० लाख २ हजार ५२० घरांचे सर्वेक्षण केले.
जूनमध्ये पावसाला सुरू झाल्यानंतर साथीच्या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागते. मात्र यंदा मे महिन्यातच पाऊस सुरू झाल्याने साथीच्या आजारांसाठी पोषक वातावरण तयार झाले. त्यामुळे २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये हिवताप आणि अतिसाराच्या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे.
मुंबईत जूनमध्ये अतिसाराचे ९३६ रुग्ण सापडले असून, त्याखालोखाल हिवताप ८८४ रुग्ण, करोनाचे ५५१ रुग्ण, डेंग्यूचे १०५ रुग्ण, हेपॅटायटिसचे ७८ रुग्ण, लेप्टोचे ३६ आणि चिकुनगुनियाचे २१ रुग्ण सापडले आहेत. जूनच्या पहिल्या पंधरवड्याच्या तुलनेत दुसऱ्या पंधरवड्यात रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
बांधकाम ठिकाणी हिवतापाचे रुग्ण
मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाल्याने साथीच्या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने मे आणि जूनमध्ये बांधकामांच्या ठिकाणी विशेष मोहीम राबविली होती. महापालिकेने तीन हजार ३३ बांधकांच्या ठिकाणांची तपासणी करून ५० हजार ८५ मजुरांचे रक्तनमुने गोळा केले. यापैकी ३० रुग्णांना हिवताप झाल्याचे आढळून आले.
डासांची ३३ हजार उत्पत्ती स्थाने नष्ट
साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने १० लाख २ हजार ५२० घरांतील ४७ लाख ९१ हजार ९७० नागरिकांचे सर्वेक्षण केले. त्याचप्रमाणे हिवतापला कारणीभूत ठरणाऱ्या ॲनोफिलीस डासांची ६ हजार ५०६ उत्पत्ती स्थाने, तर डेंग्यूच्या प्रादुर्भावासाठी कारणीभूत ठरणाऱ्या एडिस डासांची २७ हजार ४५६ उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात आली.
काय काळजी घ्याल
हिवताप, डेंग्यूला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी घरामध्ये, घराच्या आसपास कोठेही पाणी साचणार नाहीे याची दक्षता घ्यावी. साचलेल्या पाण्यात, तसेच जुने टायर, पाण्याच्या टाक्या, नळ्या, प्लास्टिक कंटेनर अशा अडगळीतील वस्तूंमध्ये पाणी साचून डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे तातडीने पाण्याचा निचरा करावा. लेप्टोच्या प्रतिबंधासाठी पावसाच्या साचलेल्या पाण्याच्या संपर्कात येणे टाळा.
अतिसारापासून बचाव करण्यासाठी रस्त्यावरील उघडे अन्नपदार्थ खाणे टाळा, पाणी उकळून प्यावे. तसेच नागरिकांनी ताप आल्यास घराजवळीला महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र, दवाखाना, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि रुग्णालयामध्ये जाऊन त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डाॅ. दक्षा शहा यांनी केले आहे.